देशातील पहिला मध महोत्सव मुंबईत

१८, १९ जानेवारी रोजी आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव-२०२४' महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे येत्या १८ आणि १९ जानेवारी रोजी होत असल्याची माहिती ‘महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामोद्योग मंडळ'चे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

फोर्ट येथील ‘महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामीण मंडळ'च्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी ‘मंडळ'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

मधमाशी केवळ मध आणि मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरु केले. ‘महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामोद्योग मंडळ' मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना' तसेच ‘मधाचे गाव' या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशा पालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष आदि उत्पादनांच्या माहिती आणि विक्रीसाठी मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेली उपउत्पादने आणि त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या सदर महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत, असे रवींद्र साठे यांनी सांगितले.

राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, मध महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या मध महोत्सव'मध्ये मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

देशाच्या सीमांवर मधमाशांचा वापर...
मधमाशा त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करुन त्याला जखमी करतात. मधमाशांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे साठे म्हणाले. त्याचबरोबर मधमाशांचे विष दुर्धर आजारावर सुध्दा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेे.

दरम्यान, मधुबन ‘महाराष्ट्र खादी-ग्रामोद्योग मंडळ'चा मधाचा ब्रँड आहे. मध शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यासाठी मधाचा उपयोग, मध निर्मिती या विषयात काम करणारे अनेक तज्ञ आणि पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या ‘महोत्सव'च्या माध्यमातून लोकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मधपाळ, शेतकरी यांच्यासाठी मधपालन कसे करायचे याचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहे, असे ‘मंडळ'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी यावेळी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ग्रंथालयांसाठी ग्रंथसंच भेट देत डॉ. प्रकाश आमटे प्रेमींनी केले वाढदिवस अभिष्टचिंतन