अखेर महावितरण आली जाग
पावणेतील त्या धोकादायक वीज वाहिन्या बदलल्या
नवी मुंबई : पावणे एम आय डी सी परिसरात वीज वाहिन्या जीर्ण होऊन त्या पाडण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे येथील वीज वाहिन्या बदलण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर महावितरणला जाग आली असून येथील वीज वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावणे एम आय डी सी परिसरात वाढत्या विजेच्या मागणीमुळे जीर्ण झालेल्या उच्च दाबाच्या वीज वाहीन्यांवर ताण येऊन त्या वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वरचेवर घडत होत्या. मागील आठवड्यात आलोक कंपनी जवळ वीज वाहिनी अंगावर पडून एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र वीज वाहिनी तुटताच (फिडर) स्वयंचलित यंत्रणेने वीज प्रवाह बंद झाल्याने या घटनेत विजेच्या धक्का लागण्याचा अनुचित प्रकार टळला होता. तर या आधीही या ठिकाणी वीज वाहिन्या खाली पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे येथील वीज वाहिन्यांच्या बाबतीत तात्काळ योग्य निर्णय घेऊन नवीन वीज वाहिन्या टाकाव्या अशी मागणी समाजसेवक अरूण पवार व मनोज चव्हाण यांनी महावितरण कडे लावून धरली होती.अखेर महावितरणला जाग आली असून येथील वीज वाहिन्या बदलण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.