नैना विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

शेतकरी उध्वस्त होणार असल्याने ‘नैना'ला विरोध

नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नैना प्रकल्प पनवेल तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. या आमरण उपोषणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. ६ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या उपोषणादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनिल नामदेव ढवळे, दमयंती नामदेव भगत, जयराम धोंडू कडू, मधुकर महादेव पाटील, समीर पांडुरंग पारधी, रवींद्र वि्ील गायकर असे ६ जण आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर पुढे अनेक शेतकरी यात सहभागी होणार आहेत. नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा नैना विरोधी सूर कायम आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर नैना नावाची मोठी राक्षसीन बसली असून तिचा नाश करायचा असून तिला तालुक्यातुन हद्दपार करायची आहे, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. ‘नैना'मुळे शेतकरी उध्वस्त होणार असून या प्रकल्पाला शेतकऱ्याचा ठाम विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘नैना'च्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने भूखंड वाटप, शासकिय-निमशासकिय गुरचरण गायरान ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा, गावकीच्या, मालकीच्या जागा, इतर शासकिय जागा आणि सामाजिक जागा चुकीच्या पध्दतीने सरकार ‘सिडको'च्या घशात घालून स्थानिक ग्रामस्थांचे अधिकार हिसकावून घेत आहे. शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांना प्रकल्पाचे फायदे-तोटे न समजावता प्रल्कप लादण्याचे काम चालू आहे. स्थानिकांची घरे, चाळी, इमारती, फार्म हाऊस आणि इतर बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यांना नोटीसा आणि तोडक कारवाई सुरु आहे. नैना प्रशासन मोफत ६० टक्के जमीन घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय करत असून, त्यांची दडपशाही सहन केली जाणार नाही. शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू राहील, अशा पध्दतीचा संदेश यावेळी देण्यात आला.

नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या ‘नैना'ला आमचा विरोध आहे. सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची सरकारला दखल नक्कीच घ्यावी लागेल, असा आत्मविश्वास यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवला. शासनाने युडीसीपीआर लागू करावा आणि नैना ऐवजी एमएमआरडीए, महापालिका क्षेत्र घोषित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमची भाकरी वाचवण्याच्या दृष्टीने या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, काशिनाथ पाटील, जी. आर. पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ॲड. सुरेश ठाकूर, राजेश केणी, शेखर शेळके, सुदाम पाटील, वामन शेळके, नामदेव फडके, सुभाष भोपी, विश्वास पेटकर, बाळाराम फडके, विलास फडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका तर्फे ‘स्वच्छ शौचालय अभियान'