विचारवंत दिलीप मंडल यांनी व्याख्यानातून उभे केले राष्ट्रनिर्माते बाबासाहेब

राष्ट्रनिर्माण बाबासाहेबांची विचारयात्रा, त्यांच्याकडे यात्रिक म्हणून पाहा -  मंडल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘विचारवेध' या व्याख्यान शृंखला अंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर और राष्ट्रनिर्माण' या विषयावर सुप्रसिध्द पत्रकार, लेखक, विचारवंत दिलीप मंडल यांनी अभ्यासपूर्ण भाष्य करीत बाबासाहेबांची राष्ट्रनिर्माता अशी प्रतिमा विविध उदाहरणे देत उभी केली. बाबासाहेबांना समजून घेताना त्यांचे काळानुरुप बदलत गेलेले विचार, त्या-त्या कालखंडातील सामाजिक स्थिती लक्षात घेऊन समजून घेतले पाहिजेत. राष्ट्रनिर्माण बाबासाहेबांची विचारयात्रा आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याकडे एक यात्रिक म्हणून पाहा, असे आवाहन दिलीप मंडल यांनी केले आहे.

दुसऱ्यांच्या संवेदना जाणून घेणे, त्यात सहभागी व्हावेसे वाटणे यामधून परस्परांमध्ये बंधुभाव वाढतो. आपुलकीची भावना वृध्दिंगत होते आणि देश उभा राहतो, अशी राष्ट्र या शब्दामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका विशद करीत  दिलीप मंडल यांनी बाबासाहेबांच्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाकडे आपण ठराविक नजरेतून एकाच दृष्टीने पाहून चालणार नाही तर त्यांच्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. विशिष्ट समुहाच्या न्याय-हक्कांसाठी लढणारा नेता ते संपूर्ण देशाच्या हिताचा एकत्रित विचार करणारा राष्ट्रव्यापी नेता अशी बाबासाहेबांची उंच उंच होत गेलेली प्रतिमा त्यांच्या काळानुरुप बदलत गेलेल्या विचारांचा समग्र अभ्यास करुन एकत्रितपणे समजून घेतली पाहिजे, असे मत मंडल यांनी व्यवत केले.

बाबासाहेबांना गुरुस्थानी असलेल्या महात्मा फुले यांनी सार्वजनिक सभा बनवायची तर सर्व नागरिकांना अधिकार मिळाले पाहिजेत, अशी सर्वसमावेशक राष्ट्राची व्याख्या पहिल्यांदा मांडली. तोच विचार पुढे नेत बाबासाहेबांनी सर्वांना मताचा अधिकार असला पाहिजे, असे प्रथमतः सांगितले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसुत्रीला प्राधान्य देत बाबासाहेबांनी सांस्कृतिक राष्ट्रीयत्व महत्वाचे मानले आणि यातूनच भारताचा राष्ट्र म्हणून विचार होऊन संविधान साकारल्याचे दिलीप मंडल यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले.

लोकशाही विचारांचे सबलीकरण, समाजातील सर्व घटकांना न्यायाची भूमिका, कटुता निर्माण करणाऱ्या विचारांचा निषेध आणि एकात्मतेची भावना या चार मुल्यांना प्राधान्य देणारा बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील वैचारिक विकासाचा काळाच्या प्रत्येक टप्प्यागणिक अभ्यास केला पाहिजे. अशा पध्दतीने बाबासाहेबांकडे साकल्याने पाहिल्यानंतर एक राष्ट्रव्यापी नेतृत्व आपल्या नजरेसमोर उभे राहते, असे मंडल यांनी स्पष्ट केले.

प्रांरभी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने दिलीप मंडल यांचे स्वागत केले. नवी मुंबई महापालिकेने उभे केलेले बाबासाहेबांचे स्मारक त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची उपलब्धी असून येथील पुस्तकांनी सजलेले ग्रंथालय, दुर्मिळ छायाचित्रांमधून माहितीसह मांडलेले विशेष दालन, भाषणाचा होलोग्राफिक शो आदि सर्व बघत स्मारकातून नुसता फेरफटका जरी मारला तरी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींनी आपण भारावून जातो. प्रत्येकाने स्मारकाला भेट देऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली पाहिजे, असा अभिप्राय दिलीप मंडल यांनी यावेळी दिला.

दरम्यान, लेखक-विचारवंत दिलीप मंडल यांनी स्मारकाला प्रत्यक्ष भेट देत आपल्या व्याख्यानातून बाबासाहेबांच्या चरित्राकडे बघण्याची चौफेर दृष्टी विकसित केल्याबद्दल उपस्थित असलेल्या रसिकांनी त्यांचे आभार मानले.

स्मारकाचा दुसरा वर्धापनदिन असल्याचे सांगत मागील दोन वर्षात दोन लाखाहून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट देऊन प्रशंसा केली आहे. तसेच आपल्या संपर्कातील इतरांनाही या स्मारकाला भेट द्यावी, असे आवर्जुन सांगितलेले असल्याने यातून स्मारकाची महती सर्वदूर पसरली आहे. स्मारकाचा आत्मा असलेले येथील ग्रंथालय आणि सातत्याने सुरु असलेली व्याखानमाला यामधून स्मारक आता ‘ज्ञानस्मारक' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे, याचा विशेष आनंद वाटतो. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नैना विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण