गड-किल्ल्यातून ग्रामीण भागात जपला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

बच्चे कंपनीकडून किल्ले बनविण्याचा उपक्रम

उरण : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मिडीयाच्या युगात वावरणारी ग्रामीण भागातील बच्चे कंपनी आजही किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसत आहे.

दिवाळी सण आनंदाचा आणि बच्चे कंपनीच्या आवडीचा सण आहे. दिवाळी सुरु होण्यापूर्वीच म्हणजे शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर लगेचच बच्चे कंपनीला वेध लागतात, ते किल्ले बनविण्याच्या कामाचे. अशातच मुलांना प्रोत्साहन देण्याकरता किल्ले बांधण्याच्या स्पर्धा देखील उरण तालुक्यातील काही सामाजिक मंडळामार्फत घेण्यात येत आहेत. पालकही बच्चे कंपनीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

चिरनेर येथील जिज्ञेश प्रफुल्ल घरत, साहिल अंकुश घरत, आयुष गणेश घरत, नितेश रंजित पाटील या बच्चे कंपनीने सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती अगदी उत्तम साकारली आहे. यातून त्यांचा उत्साह द्विगुणित होताना दिसतो. सध्या रेडिमेड किल्ले सर्वत्र पाहायला मिळत असताना, ग्रामीण भागातील मुले डोंगरातील आणि शेतातील लाल काळ्या माती पासून घराच्या अंगणात किल्ले तयार करताना पहावयास मिळत आहेत. किल्ला तयार झाल्यावर त्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केली जाते. त्याचबरोबर पहारेकरी मावळे किल्ल्यावर जागोजागी ठेवले जातात. किल्ला मावळे, सैनिक आणि रंग यांनी सजवला जातो. त्यावर मोहरी टाकून उगवलेली हिरवळ दाखविली जाते. तसेच पाण्याचे कारंजे आणि रात्री किल्ल्यावर केलेल्या रोषणाईने किल्ले उजळून निघतात.

दिवाळीमध्ये बच्चे कंपनी आणि युवक युवती देखील निरनिराळे किल्ले, गड, सामाजिक देखावे साकारुन कला आणि पारंपारिक संस्कृती जपताना दिसून येत आहेत. रायगड किल्ला, प्रतापगड, सिंधुदुर्ग गड कर्नाळा अशा प्रसिध्द किल्ल्यांची प्रतिकृती चिरनेर परिसरातील गावागावात तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीवरील ‘चान्सरीग्राफी' पुस्तकाचे प्रकाशन