खारघर टोलनाक्यावर वाहनांवर पाण्याची फवारणी

हवेतील वायू गुणवत्ता निर्देशांक चढा न राहता धुलिकणाची मात्रा कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना

पनवेल : हवेतील वायू गुणवत्ता निर्देशांक चढा न राहता धुलिकणाची मात्रा कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी पनवेल महापालिकेला दिलेल्या आदेशानंतर काही तासातच पनवेल-सायन महामार्गावर खारघर टोलनाक्यावर महापालिकेने वाहनांवर पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पहिल्यांदाच केलेल्या या प्रयोगामध्ये एका तासात साडेतीनशे हुन अधिक वाहनांवर फवारणी करण्याचे काम १० नोव्हेंबर रोजी सायंकाळपासून सुरु झाल्याने हवेतील प्रदुषण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीने याबाबतची उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर काही तासात महापालिका प्रशासनाने खारघर टोलनाक्यावर पाण्याच्या टाकी आणि इतर यंत्रणा येथे कार्यान्वित केली आहे.

सदर ठिकाणी १० हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली असून एकावेळी १२ नोझल टोलनाक्यावर सुरु आहेत. तसेच एका टाकीतील पाणी २ तासांत संपल्यानंतर पुन्हा नव्याने टाकी भरली जाते. तासाला ३०० ते ३५० गाड्यांवर पाणीमारा केला जात असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली आहे. स्वतः आयुक्त देशमुख यांनी सदर यंत्रणा व्यवस्थित चालविली जाते का? याचा आढावा घेतला. सदरचे काम तातडीने करण्यासाठी घनकचरा आणि आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, पर्यावरण विभागाचे डॉ. वैभव विधाते, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण, अभियंता प्रितम पाटील आणि त्यांच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

यासाठी लागणारे पाणी सध्या महापालिकेच्या कोपरा तलावातून आणले जात आहे. २४ तास यंत्रणा सुरु ठेवण्यात येणार आहे. यासाठी १२ ते १५ टँकर पाणी लागेल, असे नियोजन महापालिकेने केले आहे. पाण्याची फवारणी पुढील पाच ते सहा दिवस सुरु राहणार आहे. वाहनांंवर पाणी फवारणी करण्याचा सदर प्रयोग पहिल्यांंदाच राष्ट्रीय महामार्गावर केला जात आहे. यामुळे मुंबईमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवरील माती आणि धूळ कमी होऊन मुंबई शहरातील हवेतील धुलिकण कमी होण्यास मदत होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे वृद्धाश्रमात दिवाळी फराळाचे वाटप