मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना  प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

 प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रदुषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदुषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपुरक भूमिका घेऊन प्रदुषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान-२०२३' अंतर्गत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा ‘मुंबई शहर'चे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्यांक-पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग'चे प्रधान सचिव प्रवीण दराडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदि यावेळी उपस्थित होते.

जगभरात सध्या पर्यावरण गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि या घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. अशावेळी पर्यावरणपुरक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्याचमुळे राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियान सारख्या मोहिमेतून ‘पर्यावरण संवर्धन'साठी काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर त्या कुटुंबात पालकही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला, तर तो निश्चितपणे सर्वांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाची दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदाची जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात ‘पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग'चे प्रधान सचिव दराडे यांनी प्रदुषणमुक्त दीपावली संकल्प अभियान-२०२३ राबविण्यामागील भूमिका समजावून सांगितली. गेल्या काही वर्षात ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी आजही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. त्याच उद्देशाने ‘मंडळ'मार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारे हवा आणि ध्वनीचे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रदुषणमुक्त दिवाळी संकल्पना राबविली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दराडे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान'