वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास प्राधान्य द्या
संचालक विश्वास पाठक यांची ‘महावितरण'च्या अधिकारी-अभियंत्यांना सूचना
ठाणे : वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या सेवाविषयक समस्या, तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे तसेच निर्धारित मानकाप्रमाणे तत्पर ग्राहक सेवांवर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कपंनीचे संचालक विश्वास पाठक यांनी वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि अभियंता यांना दिले आहेत.
ठाणे जिल्हा अंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आ. किसन कथोरे, आ. संजय केळकर, ‘महावितरण'चे मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद भादीकर, कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे तसेच महावितरण, महापारेषण, मेडा या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे अधिकारी आणि अभियंते यावेळी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील ‘महावितरण'च्या भांडुप आणि कल्याण परिमंडलातील ठाणे, वाशी, कल्याण एक आणि दोन या चारही मंडलातील महसूल, वसुली, थकबाकी, वीज गळती, त्यावरील उपाययोजना, पायाभूत सुविधा, वीज पुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती आणि आगामी नियोजन यासंदर्भात बैठकीत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच पाठक यांनी ‘महावितरण'ने केलेल्या कामाचे कौतुक केले.
सदर बैठकीला विधीज्ञ चेतन पाटील, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, ‘महापारेषण'चे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, ‘मेडा'चे मुख्य अभियंता डी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह चारही मंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.