चिर्ले गावातील अंडर पास बनला धोकादायक!

अंडरपास रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी


उरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास (भुयारी) रस्त्यावर ३० ऑवटोबर रोजी मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात चारचाकी वाहन आणि मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला आहे.

जेएनपीए बंदर प्रशासनाने एनएच-४बीच्या माध्यमातून जेएनपीए बंदर ते पळस्पे फाटा या महामार्गाची उभारणी केली आहे. या महामार्गावरील चिर्ले आणि धुतूम गांव परिसरातील नागरिकांना, प्रवासी वाहनांना सुखकर प्रवास होण्यासाठी एनएच-४बीने चिर्ले आणि धुतूम गावाजवळ अंडर पास (भुयारी) रस्त्याची उभारणी केली आहे. परंतु, सदर अंडर पास रस्ता प्रवासी वाहतुकीसाठी असताना या रस्त्यावरून रात्री-अपरात्री अवजड वाहने धावत आहेत. त्यामुळे अपघाताची संख्या बळावली आहे.

त्यातच मागील महिन्यात धुतूम गावाजवळील अंडर पास रस्त्यावर मालवाहू कंटेनर चारचाकी गाडीवर पलटी होण्याची घटना घडली होती. सुदैवानी या अपघातात चालक थोडक्यात बचावला होता. या अपघातानंतर चिर्ले गावातील श्री राम मंदिर परिसरातील अंडर पास रस्त्यावर ३० ऑवटोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी होण्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला आहे.

एनएच-४बी ने चिर्ले आणि धुतूम गाव परिसरातील नागरिकांचा, दैनंदिन नोकरदार नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सदर गावाजवळ अंडर पास मार्ग बनविण्यात आला आहे. परंतु, रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावरील अंडर पास रस्त्यावरुन रात्री-अपरात्री अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. त्याचा त्रास येथील नागरिक, लहान वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या रहदारीच्या अंडर पास रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी. अन्यथा होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा जीव जाणार. अशी भिती सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी व्यक्त केली आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अस्वच्छ पनवेल!