मुबलक पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेचे नियोजन

प्रायोगिक तत्वावर नवीन नियोजनानुसार पाणी पुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना पुरेशा प्रमाणात समाधानकारक पाणी पुरवठा व्हावा याकरिता महापालिका कडून पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार विभागनिहाय ६ ते ७ तास पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुुरु करण्यात आली आहे. दरम्यान, सदरचे नियोजन प्रत्येक विभागातील जलकुंभ भरण्याच्या वेळांचे करण्यात आलेले आहे. नागरिकांना वितरित केले जाणारे पाणी सकाळी आणि संध्याकाळी पूर्वीप्रमाणेच केले जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे महापालिका तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्वी सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील विविध विभागातील जलकुंभ एकाच वेळी भरले जात असल्याने पाण्याचा दाबाची समस्या जाणवत होती. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने जलवितरण प्रणालीचा बारकाईने अभ्यास करुन जलकुंभ भरण्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार केले. या नवीन नियोजनानुसार सध्या पाणी पुरवठा प्रणाली राबविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख असून यावर्षी २४ सप्टेंबर रोजी मोरबे धरण पूर्णपणे भरले आहे. १९ ऑक्टोबर रोजी मोरबे धरणातील जलसाठा १८४.३८ द.ल.घ.मी. म्हणजेच ९६ टक्के इतका आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोरबे धरणातून दररोज ४५० द.ल.लि. आणि ‘एमआयडीसी'च्या बारवी धरणातून ८० द.ल.लि. इतक्या प्रमाणात दैनंदिन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरीही सध्या ‘एमआयडीसी'कडून महापालिकेला आवश्यक असलेल्या दैनंदिन ८० द.ल.लि. पाणी पुरवठ्याऐवजी प्रत्यक्षात ६० ते ६५ द.ल.लि. इतकाच पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

त्यामुळे ‘एमआयडीसी'कडून उपलब्ध होणारे पाणी शिळ येथील जलकुंभात घेऊन ते दिघा, ऐरोली आणि घणसोली विभागातील काही क्षेत्रात वितरीत केले जाते. तसेच एमआयडीसी भागातील नेरुळ येथील शिवाजीनगर, बोनसरी, इंदिरानगर, गणपतीपाडा, महापेगांव, पावणेगांव त्याचप्रमाणे घणसोली विभागातील रबाले, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर तसेच ऐरोली विभागातील चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी आणि संपूर्ण दिघा विभाग क्षेत्र याठिकाणी थेट ३३ नळजोडणींद्वारे वितरीत केले जाते. सदर भागातील नागरिकांच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत.

एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टी आणि गांवठाण भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सदर भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्याकरिता तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, कातकरीपाडा (भीमनगर) येथे नवीन जलकुंभ बांधण्याचे काम महापालिका मार्फत हाती घेण्यात आले आहे. परंतु, सद्यस्थितीतीत सदर भागात ‘एमआयडीसी'कडून रात्रीच्या सुमारास अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याबाबत तेथील नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी येतात.

त्याचप्रमाणे घणसोली आणि ऐरोली भागात शिळ एमबीआर येथे ‘एमआयडीसी'कडून होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सदर भागाची तूट भरुन काढण्यासाठी मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून या भागासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
सदर परिस्थिती पाहता ‘एमआयडीसी'कडून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि समस्येचे निवारण करण्याकरिता ‘एमआयडीसी'कडून होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे सातत्याने विचारणा आणि पाठपुरावा सुरु आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर वरिष्ठ पातळीवरुन सदरची समस्या मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत.

सद्यस्थितीत मोरबे धरणातून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज पूर्ण क्षमतेने ४५० द.ल.लि. पाणी पुरवठा करण्यात येत असून दररोज प्रतिमाणसी १३५ लीटर या तुलनेत अधिक प्रमाणात प्रतिमाणसी २२० लीटर इतका जास्त पाणी पुरवठा नागरिकांना केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा गरजेच्या गोष्टीसाठी सुयोग्य वापर करण्याबाबत महापालिका विविध माध्यमांतून सातत्याने आवाहन करीत आहे.

पूर्वी विभागांमध्ये असलेल्या जलकुंभात सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा जलपुरवठा करुन तेथून नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी दोनवेळा पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, या प्रक्रियेत संपूर्ण शहरात सर्वत्र एकाच वेळी जलकुंभात पाणी साठवणुकीसाठी जल पुरवठा करण्यात येत असल्याने पाण्याचा दाब, भौगोलिक अंतर अशा विविध कारणांमुळे अनियमित आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे नवी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि जलवितरण व्यवस्थेचा शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाने विभागनिहाय बारकाईने अभ्यास केला. त्यानुसार जलकुंभ भरण्याच्या वेळांचे नवीन नियोजन केले. यामध्ये बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे ४.३० ते सकाळी ११.३०, घणसोली विभागात सायंकाळी ८.३० ते रात्री २ तसेच ऐरोली आणि दिघा विभागात दुपारी २ ते पहाटे ४ या वेळेत विभागनिहाय जलकुंभ भरले जाणार असल्याने एकाच वेळी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनावर येणारा ताण विभागला जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना पूर्वीच्याच प्रचलित वेळी पूर्वीसारखाच सकाळी आणि संध्याकाळी पाणी पुरवठा केला जाणार आहे.

पाणी पुरवठ्याची नवीन प्रणाली राबविण्यास प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेली आहे. महापालिकेने सन २०५५ सालातील लोकसंख्येचा विचार करुन अतिरिक्त जलस्त्रोतांचा शोध घेण्यासाठी आणि योग्य पर्यांयांची निवड करण्याकडे विशेष गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्याकरिता तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सीबीडी-बेलापूरच्या गावस्कर मैदानात होणार रावणाच्या चाळीस फुटी प्रतिकृतीचे दहन ​​​​​​​