पावसाळापूर्व कामांसाठी ३० मे पर्यंत डेडलाईन

नवी मुंबई : पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्‌भवणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक पूर्वतयारी करावी आणि येत्या ३० मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, महापालिकेसह शहरातील इतर सर्व प्राधिकरणांनी आपत्ती नियंत्रणाच्या दृष्टीने पावसाळ्याआधी आणि पावसाळा कालावधीत परस्पर समन्वय आणि संवाद राखावा, असेही आयुवत शिंदे यांनी सूचित केले.

महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'ची नियोजन बैठक २८ मार्च रोजी संपन्न झाली. याप्रसंगी नवनियुवत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, ‘शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'चे सचिव तथा प्र. अतिरिक्त आयुक्त शरद पवार, शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई तसेच इतर विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लि., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदि विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचा अत्यावश्यक कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सध्याचा निवडणूक आचारसंहिता कालावधी लक्षात घेऊन सदरची कामे करण्यासाठी शासन पातळीवरुन  आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशित केले. या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया तातडीने करुन सर कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

महापालिका क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करावीत. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची एमआयडीसी आणि महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करुन त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना धोका लक्षात आणून देऊन त्यांचे स्थलांतरण करावे, अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्ट्या स्थलांतरणाबाबत तसेच दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणाऱ्या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले.

‘पीडब्ल्यूडी'कडे शहरातील मुख्य आणि मध्यवर्ती सायन-पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त आणि सुस्थितीत रहावा यादृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी. तुर्भे उड्डाणपुलाचा एक आर्म तोडण्याचे काम सुरु असून वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही आणि विशेषत्वाने पावसाळी कालावधीत याची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्त शिंदे यांच्यामार्फत निर्देशित करण्यात आले. अशाच प्रकारे एमएमआरडीए मार्फत सुरु असलेल्या कामांमुळे नाल्यांच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही, असेही आयुवत शिंदे म्हणाले.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार महापालिका क्षेत्रात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे जलद पूर्ण करावीत. पावसाळी कालावधीत मोठ्या भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य जागांवर आवश्यक पंपींग मशीन आणि मनुष्यबळ कार्यांन्वित राहील, याची दक्षता घ्यावी. यादृष्टीने पावसाळी कालावधीतील नालेसफाई आणि गटारे सफाईची कामे काटेकोरपणे आणि जलद गतीने विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्व पावसाळापूर्व कामांचा आपण स्वतः पाहणी करुन आढावा घेणार असल्याचे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

पावसाळा कालावधीत महापालिकेचा मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्ष तसेच विभागीय नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन केंद्रातील कक्ष २४ X ७ आवश्यक मनुष्यबळासह आणि यंत्रसामुग्रीसह सुसज्ज राहतील याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्तीकाळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याच्या जागा निश्चित करुन तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील, याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे. या कालावधीत रॅपीड ॲक्शन फोर्स, नागरी संरक्षण दल, मच्छिमार संघटना यांची मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्यांच्या ऑनलाईन उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनाही मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.

धोकादायक इमारती अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे बांधकाम साईटस्‌वर धूळ नियंत्रण आणि पावसाळी कालावधीत अपघात होऊ नये तसेच त्याठिकाणी डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत यादृष्टीने संबंधितांना पूर्वसूचना देऊन खबरदारी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.

दरम्यान, कोणतीही आपत्ती आल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आपत्ती येऊच नये यादृष्टीने खबरदारी घेणे  महत्वाचे आहे. तरीही नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्यामध्ये हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याकरिता पूर्व नियोजन बैठक महत्वाची असून बैठकीत झालेल्या विस्तृत चर्चेनुसार नियोजन करावे आणि त्याची गांभीर्याने अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुवत डॉ. कैलास शिंदे यावेळी दिल्या.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी देऊ नये आणि दिलेल्या परवानग्यांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करुन ते खोदकाम पूर्ववत केले जाईल, याची दक्षता घ्यावी. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत. महापालिकेसह तिन्ही प्राधिकरणांच्या अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याची खबरदारी घ्यावी. एपीएमसी मार्केट शहरातील एक महत्वाचा भाग असून येथील अंतर्गत स्वच्छतेबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अंतर्गत नालेसफाई आणि विशेषत्वाने पावसाळी कालावधीतील स्वच्छतेची गांभिर्याने काळजी घ्यावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली मधील अनधिकृत इमारत ८ आठवड्यात जमीनदोस्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश