ठाणे पालिका आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला

ठाणे :  ठाणे पालिका आयुक्तपदाचा कार्यभार २२ मार्च रोजी सौरभ राव यांनी स्वीकारला. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पालिका नवे आयुक्त सौरभ राव यांचे स्वागत करून त्यांच्याकडे ठाणे पालिका आयुक्तपदाची सुत्रे सोपवली. पालिका मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींसह अन्य अधिकारीवर्ग आणि कर्मचारी यांनी नवे पालिका आयुक्त सौरभ राव यांचे स्वागत केले.

  सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे २२ वे आयुक्त आहेत. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. श्री. राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून राज्य शास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्य सेवेत तसेच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले. २००३ मध्ये राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. २००४ मध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

वास्तव्यासाठी ठाणे सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करण्याची नव्या आयुवतांची ग्वाही
ठाणे महानगर पालिकेच्या कार्यभाराचा स्वीकार करतानाच कार्यक्रमात नवे आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्याचा गौरव करीत ठाणे हे महत्त्वाचे शहर असून झपाट्याने होणारा विकास आणि वाढती लोकसंख्या यांचा विचार करून हे शहर राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर असावे, असा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्य शासनाने महत्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिली असून आतापर्यंतच्या माझ्या जो प्रशासकीय अनुभवाच्या आधारावर या शहराचा अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, राहण्यासाठी उत्तम शहर अशा पध्दतीने विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली, वाहतुकीचा विषय, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, अतिक्रमण या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहे. पुढील २५ वर्षांत शहराचा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याचा एक कृती आराखडा तयार करण्यात येईल. त्यात तातडीचे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन महत्त्तवाचे विषय निश्चित केले जातील, असेही आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख यांची बैठक घेतली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल, बेलापूर मधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त