मतदार यादीत पत्यावर न राहणाऱ्या मतदारांची नोंद

डोंबिवली : लोकसभा निवडणूक जवळ असताना मतदार यादीत चूक झाली आहे. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मधील निवासी प्रभागात दुसरीकडील प्रभागातील नागरिकांची नावे असून यात मतदार यादीत काही नावे गुजराती भाषेतून दिली असल्याचे दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात गुजराती भाषेला इतके महत्त्व का दिले जात आहे? असा प्रश्न ‘शिवसेना'चे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदासंघाच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये डोंबिवली पूर्वकडील एमआयडीसी मधील निवासी प्रभाग याद्यांची छाननी केली असता त्यात १०० हुन अधिक नावे प्रभागातील नागरिकांची नसल्याचे निदर्शनास आले आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर मतदार याद्यांमधील नावे आणि त्यामधी पत्त्यावर जागेवर जाऊन पाहणी केली असता नावे असलेल्या व्यक्ती तेथे राहत नसल्याचे समजले. तसेच त्या व्यक्ती एमआयडीसी निवासी प्रभाग राहत नसून दुसऱ्या प्रभागात राहण्यास असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, कल्याण ग्रामीण विधानसभा यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी याबाबतीत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन भालचंद्र म्हात्रे यांना दिले आले.

मतदार यादीत एका ठिकाणी निवासी विभागातील बंगल्याच्या प्लॉट क्रमांक आदि पत्ता असलेल्यांवर भलत्याच व्यक्तीचे नाव बघून संबंधित बंगला मालकाने त्याबाबत विद्युत, पाणी बिलाच्या पुराव्यानिशी तक्रार, मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे केली आहे. भविष्यात या मालमत्ता (बंगला) विषयी मालकी वाद उत्पन्न होऊ नये, असे संबंधितांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रभाग बाहेरील नागरिकांची मतदार नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करुन जर ते  बोगस असल्याचे सिध्द झाले तर त्यांची मतदार नोंदणी रद्द करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. येत्या ८ दिवसांत कारवाई न झाल्यास स्थानिक रहिवाशांचे शिष्टमंडळ मतदार नोंदणी अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील, असे भालचंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

एकंदरीच मतदार यादीत बराच घोळ झाला असून अशा मतदार याद्यांमुळे मतदानाचा टक्का वाढणार कसा? असा प्रश्न माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

मतदार यादीत असंख्य नावे दोनदा आली आहेत. तसेच काही मृत व्यक्तींची नावे देखील यादीत आहेत. सदर नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मतदार यादीत काही स्थानिक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत असूनही त्यांच्यावर डिलीट शिक्का मारण्यात आला आहे. तर येथील मतदार यादीत काही नावे गुजराती भाषेतून दिली असल्याचे दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात गुजराती भाषेला इतके महत्त्व का दिले जात आहे. -भालचंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज