फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेच्या तब्बेतीची काळजी घ्या

डोंबिवली : मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा ‘मराठा आरक्षण'साठी आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाला चार दिवस उलटले असून जरांगे यांनी उपचारासाठी नकार दिला. या ‘उपोषण'कडे सरकारने गांभीर्याने बघावे याकरिता मनसे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सरकारने फोडाफोडीचे राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेच्या तब्बेतीची दखल घ्यावी, असे टि्‌वट केले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणास बसल्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने याची दाखल घेत यावर चर्चा करणे आवश्यक होते. ‘मराठा आरक्षण'साठी लाखो-करोडो मराठा बांधवांसाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांनी भेट घेऊन आश्वासन दिले होते. मात्र, मराठा समाजासाठी आरक्षण मिळणे फक्त आश्वासन आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास चार दिवस उलटून जरांगे यांची तब्येत ढासळत असून त्यांनी उपचारास नकार दिला आहे.

यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टि्‌वट करत सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. ‘मराठा आरक्षण'बाबत सरकाराने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंंमलबजावणी करुन, विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे. आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, राज्यभरात ‘शिंदे समिती'च्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी, अशी मागणीही आ. राजू पाटील यांनी केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्हॅलेंटाईन डे'ला ५४ जण ‘लग्नाच्या बेडीत'