पनवेल परिसरातील पाणी पुरवठ्यामधील अडचणी दूर करण्याचे निर्देश

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना मुंबई मध्ये आयेजित बैठकीत दिले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह येथे ३० जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, ‘नगरविकास विभाग'चे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास पाणी पुरवठा सचिव संजय खंदारे, ‘एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा नेते परेश ठाकूर, ‘भाजप'चे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ‘शिवकर ग्रामपंचायत'चे सरपंच आनंद ढवळे, ॲड. चेतन जाधव, पनवेल महापालिका पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास सहा वषपिक्षा अधिक काळ उलटून गेला असून, महापालिका क्षेत्राअंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पनवेल महापालिकेस मुख्यत्वे सिडको, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आदी प्रशासनावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा या प्रशासनांकडून पाणी पुरवठयाबाबत दिरंगाई झाल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याला होऊन अनेक वेळा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पनवेल महापालिकेस पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतःचा असा पूर्ण क्षमतेचा स्वतंत्र जलस्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणी पुरवठ्यासाठी कायमच दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते. पनवेल महापालिकेसाठी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण असावे असा प्रस्ताव आणि पत्रे जलसंपदा विभागास पाठविण्यात आली असून, त्याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. तसेच सद्यस्थितीतील तूट भरुन काढण्याकरिता पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दशलक्ष लिटर पाणी आरक्षण मिळण्याचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयाकडे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कार्यालयाकडून सादर करण्यात आला आहे. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कोलाड येथील डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभाग जलसंपदा कार्यकारी संचालक यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिका अंतर्गत पाणी टंचाई कमी होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेकडून पनवेल महापालिका क्षेत्राला आणि शेजारील गावांना देखील आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे कनेक्शन दिले पाहिजेत, अशी मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी केली.

दरम्यान, बाळगंगा धरणाची भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याची आवश्यकता असून, पनवेल परिसरातील छोट्या धरणातून पाणी पुरवठा होण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आ. महेश बालदी यांनी या चर्चेदरम्यान अधोरेखित केले.

यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत पनवेल महापालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासित केले. पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दश लक्ष लिटर पाणी आणि कायमस्वरुपी उपाय म्हणून डोलवाल बंधाऱ्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या न्हावाशेवा टप्पा-३ प्रकल्पाचे काम येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असल्याची खात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या सर्व प्रक्रियेत तात्काळ कार्यवाही होण्यासाठी पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबरीने आगामी उन्हाळा पाहता पनवेलमध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तात्काळ नविन पंप यंत्रणा कार्यान्वित करुन फेब्रुवारी-२०२४ अखेर पर्यंत प्रतिदिन २५ दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. त्या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनावर ताण येत असतो. पाणी पुरवठा कायम व्हावा, यासाठी योग्य उपाययोजनांची गरज होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल बाबतीत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. पनवेल परिसराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पाणी पुरवठा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचना आणि निर्देशामुळे पनवेलकरांना मोठा फायदा होणार आहे. - आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गडकरी रंगायतन'चे लवकरच नुतनीकरण