‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' उपक्रमाचे चौथे सत्र संपन्न

ठाणे : ठाणे महापालिका अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सुचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  सुरु केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच २३ जानेवारी रोजी पार पडले. या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. चर्चासत्रामध्ये शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी २० वर्षानंतर ठाणे शहर कसे असावे, विशेष मुलांसाठी निवारा घर, घनकचऱ्याची समस्या, शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून त्याचा अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिली.

सदर चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेश बेडेकर, ‘सरस्वती शाळा'चे विश्वस्त सुरेंद्र दिघे, ‘ठाणे जिल्हा प्रवासी महासंघ'चे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, दिव्यांग तसेच शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले, ‘समता विचार प्रसारक संस्था'चे जगदिश खैरालिया, नेत्रविकार तज्ञ तथा ‘आर. निसर्गसंस्था'च्या डॉ. लता घनश्यामनानी, ‘प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्था'च्या अनुजा गुप्ते, ‘पर्यावरण दक्षता मंच'च्या सचिव संगीता जोशी, ‘समर्थ भारत व्यासपीठ'चे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, ‘प्रवासी महासंघ'चे सदस्य राजेश जाधव, आदि उपस्थित होते.

‘ठाणे'चे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरांतर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु, लोकसंख्येच्या मानाने ‘टीएमटी' बसची कमतरता आहे. महापालिकेने शहरातील रस्ते मोठे केले असले तरी परिवहन सेवा सक्षम केलेली नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशी वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचे अपग्रेडेशन झाले पाहिजे बऱ्याचवेळा अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्याने प्रवाशांची विशेषतः नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते. अशाप्रकारे बससेवा का रद्द होते?  परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. तर ‘परिवहन'च्या तापयात ई-बसेस आणून आपण आधुनिकीकरणाचा अवलंब केल्याबाबत ‘प्रवासी महासंघ'च्या वतीने मिलिंद बल्लाळ यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.

परिवहन सेवा सक्षम आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून रस्ते कामासाठी खर्च होणाऱ्या रवकमेतील १० टक्के रक्कम बाजूला ठेवून त्याचा विनियोग परिवहन सेवेसाठी करावा. यामध्ये लोकसंख्येच्या मानाने बसेस उपलब्ध करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, अशी सूचना बल्लाळ यांनी केली.

आज विविध कारणांमुळे प्रदुषण होत असते. महापालिकेने यासाठी अनेक उपाययोजना राबविल्यामुळे प्रदुषण कमी करण्यास आपण यशस्वी झालो आहोत तरी देखील अनेक वाहन चालक विनाकारण हॉर्न वाजवित असतात. त्यामुळे या लगत असलेल्या शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल यांना त्रास होत असतो. याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करुन त्यावर निर्बंध आणावेत. शहरामध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत असल्याचे दिसून येते. शहरातील मॉलमधील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होईल का याबाबत संबंधितांशी चर्चा करुन पार्किंगची समस्या कमी करावी. तसेच तसेच शहरामध्ये मल्टिस्टोर पार्किंग उभारण्याबाबत या अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही यावेळी मिलिंद बल्लाळ म्हणाले.

दरम्यान, यावर्षीचा अर्थसंकल्प तयार करताना असताना निश्चितच २० वर्षानंतर ठाणे कसे असावे? ते आजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघणे देखील गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी बालभवन उभारणे,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे रुपांतर बालभवनात करणे, कोरोना काळापासून बंद असलेले ‘ठाणे'मधील विज्ञान केंद्र पूर्ववत सुरु करणे, सायकलस्नेही वाहतूक व्यवस्था तयार करणे, ‘ठाणे'मध्ये झोपडपट्टी विभागातील मुलांसाठी वाचनालये, अभ्यासिका सुरु करणे, शिक्षकांना शिकवण्याचेच काम असावे, महापालिकेच्या माध्यमातून निवारा कार्यशाळा उभारणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण बाबत प्रभावी जनजागृती करणे, विशेष मुलांसाठी शेल्टर होम, आदि सूचना यावेळी करण्यात आल्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३८ वर्षे पुुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी!