महापालिका शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा उघड

तुर्भे : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे महापालिका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही अद्याप गणवेशासह शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिन गणवेशाविना गेला असतानाच आता प्रजासत्ताक दिन देखील गणवेशाविनाच जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी देशात नावाजलेल्या महापालिकेच्या कारभाराला गालबोट लागल्याची चर्चा आहे. प्रभागातील कामांसाठी बेंबीच्या देठापासून ओरडणारे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांच्या केबिनच्या पायऱ्या झिजवणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी महापालिका शाळेतील गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मिळत नसतानाही मिठाची गुळणी घेऊन बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य शासनाच्या आदेशानुसार ‘डीबीटी'द्वारे दिले जात होते. मात्र, या प्रकियाला पालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ई-रुपी प्रणालीद्वारे शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशासह सर्व शैक्षणिक साहित्याच्या नमुन्याची पडताळणी प्रयोगशाळाद्वारे देखील करण्यात आले होती. परंतु, या संदर्भात कार्यादेश देण्याची बाब अंतिम टप्प्यात असतानाच आयुक्तांना गणवेश डीबीटीतून वगळण्यात आल्याचे परिपत्रक निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे गणवेश वगळता अन्य साहित्य ‘ई-रुपी' प्रणाली द्वारे देण्याचे अंतिम होत आले होते. परंतु, निविदा काढून गणवेश पुरवठा करण्यास विलंब होणार असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गणवेशाचे पैसे डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे अधिक सोयीस्कर राहील असा अंतिम निर्णय झाला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करुन त्याची देयके शाळेच्या शिक्षकांकडे जमा करावी आणि पुढे ती शिक्षण विभागाकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील, असे आदेश महापालिका शिक्षण विभाग द्वारे सर्व शाळेच्या मुख्याध्यापक-मुख्याध्यापिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व मुलांना घराजवळील दुकानातून गणेवश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, आधीच हातावर पोट असलेल्या गरीब पालकांना अचानक गणवेशासाठी एक ते दीड हजार रुपये कुठून आणायचे?, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्वातंत्र्यदिन गणवेशाविना साजरा करावा लागला, तसा आता प्रजासत्ताक दिनही गणवेशाविना साजरा करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शैक्षणिक वर्ष संपण्यास केवळ तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे ‘ई-रुपी' प्रणालीद्वारे देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यास विलंब होण्यास दोषी असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर कोणती कारवाई करणार की त्यांना असेच सोडून देणार, याकडे आता महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांचे लक्ष लागले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये रग्बी फुटबॉल मैदान उभारण्याच्या स्वप्नाचा भंग