एमआयडीसी अग्निशमन केंद्रात २२१ कर्मचाऱ्यांची भरती

वाशी : नवी मुंबई शहरातील कळवा ते नेरुळ दरम्यान ५३९ .२५ हेक्टर जागेवर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) वसली असून, या एमआयडीसी मध्ये ४ हजार उद्योग आहेत. त्यामुळे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात  आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, आगीची आपत्तीजनक स्थिती हाताळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ एमआयडीसी अग्निशमन दलाकडे अपुरे असून, अवघ्या ४७ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण औद्योगिक वसाहतीची मदार आहे. परंतु, आता एमआयडीसी परिसरातील आग विझवणारे अपुरे हात आता वाढणार असून, एमआयडीसी अग्निशमन दलातील भरती प्रकिया लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर आवश्यक अग्निशमन दल केंद्रांना आवश्यकतेनुसार मनुष्य पुरवठा केला जाणार आहे.

एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु असून, यामध्ये रासायनिक कंपन्या देखील मोठ्या संख्येने आहेत. परिणामी एमआयडीसी भागात नेहमीच आगीच्या घटना घडत असतात. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी एमआयडीसी मार्फत औद्योगिक वसाहती करीता तुर्भे, पावणे आणि रबाळे या तीन अग्निशमन दल केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी पावणे एमआयडीसी अग्निशमन केंद्र ठाणे- बेलापूर असोसिएशन तर्फे चालवले जात असून, या केंद्रास एमआयडीसी अनुदान देते.

तीन एमआयडीसी अग्निशमन केंद्रात अवघे ४७ कर्मचारी तैनात आहेत. यात तुर्भे येथे १३, पावणे येथे १६ आणि रबाळे येथे १८ कर्मचारी कार्यरत आहेत.याठिकाणी एकूण ९ वाहने उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र अल्प आहे. प्रत्येक अग्निशमन दल वाहनावर ६ कर्मचारी असणे गरजेचे आहे. याशिवाय वाहन चालकांची देखील कमतरता आहे. त्यामुळे एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना दरदिवशी ८ तासाची दोन वेळा ड्युटी करुन १६ तास सजग राहावे लागते. त्यामुळे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण पडत आहे. परिणामी औद्योगिक भागात एखादी आगीची मोठी घटना घडली तर अग्निशमन दल अपुरे पडत आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरील पडणारा ताण कमी करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने एकूण २२१ जणांची भरती प्रकिया राबवली आहे. सदर भरती प्रकिया अंतिम टप्प्यात असून, भरतीनंतर एमआयडीसी अग्निशमन केंद्रात आवश्यकतुनंसार मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ'च्या एमएमआर क्षेत्रातील एकंदरीत अग्निशमन दलातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता महाऑनलाईन मार्फत भरती प्रकिया राबविण्यात आली आहे. सध्या आलेल्या अर्जांची छाननी सुरु आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखत, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी पार पाडली जाणार आहे. त्यात पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन एमआयडीसी अग्निशमन केंद्र निहाय कर्मचारी दिले जाणार आहेत. - मिलिंद व्ही.ओगले, सहाय्यक केंद्र प्रमुख - टीटीसी इंडस्ट्रीज अग्निशमन दल. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धुतूम ग्रामस्थांचे इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनी विरोधात आंदोलन