ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाला संपन्न
डॉ. आंबेडकर भारताने जगाला दिलेले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ -डॉ.नरेंद्र जाधव
ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बॅरिस्टर पदवी वगळता त्यांच्या इतर सर्व पदवी या अर्थ विषयक आहेत. आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांनी ‘पीएचडी'साठी संघराज्य व्यवस्थेवरील केलेले संशोधन, लेखन अत्यंत सखोल, विस्तृत आहे. त्यांचा ‘भारतीय रुपया प्रश्न, उगम आणि उपाय' ग्रंथ तर आम्हाला पूर्ण समजला, असा दावा आजही कुठलाही अर्थतज्ञ करु शकणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिन'चे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमालेतील अकरावे पुष्प ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार' या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ञ, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी डॉ. नरेंद्र जाधव यांचे ग्रंथबुके, त्यांची प्रतिमा असलेले अर्कचित्र भेट देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी कामगार उपायुक्त लोखंडे, लेटस् रिड इंडियाचे प्रफुल्ल वानखेडे, ज्येष्ठ इतिहास तज्ञ सदाशिव टेटविलकर, ज्येष्ठ कान नाक घसा विकार तज्ञ डॉ. प्रदीप उप्पल, लेखक मकरंद जोशी, प्रभात चित्र मंडळाचे संतोष पाठारे, आदि उपस्थित होते.
जागतिक अर्थप्रणालीचा प्रचंड अभ्यास असणारे बाबासाहेब आपल्या देशासाठी कोणती आर्थिक प्रणाली योग्य ठरेल याचे स्पष्ट निदान करणारे ‘भविष्यवेधी अर्थतज्ञ' असल्याचेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी नमूद केले. अर्थतज्ञ आणि अर्थप्रशासक या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सहजसोपी उदाहरणे देत समजावून सांगत त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते ते कार्य कुशल प्रशासक देखील होते. भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ डॉ.आंबेडकर होते. देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, कामगारांच्या कामाचे तास १२ वरुन ८ तास करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीपूर्व रजा सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेले बदल आहेत. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही विषयात या दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताबाबत त्यांनी कायम एकत्र काम केल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
मोठी माणसे देशाचा विचार करताना वैयक्तिक विचारसंघर्ष बाजुला ठेवून संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करतात, ते अनेक उदाहरणांतून पटवून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे विविध प्रसंग डॉ. नरेंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले.
कायदेतज्ञ म्हणून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या न्याय व हक्कांसाठी विविध आंदोलनातून लढा दिलाच; शिवाय कायदेमंत्री म्हणून अनेक लोकहितकारी आणि विशेषत्वाने स्त्री कल्याणकारी कायदे केले. हेच त्यांचे मोठेपण असल्याचे डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले.
सन १९४२ ते १९४६ या कालावधीत व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर खात्याचे मंत्री होते. या खात्याबरोबरच जलसिंचन आणि ऊर्जा विभाग सुध्दा या मंत्रालयाला जोडले गेले होते. या तिन्ही महत्त्वाच्या विभागाच्या नियोजनाचा पाया डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकाळात घातला गेला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष म्हणूनही बाबासाहेबांनी काम पाहिले. भारताची श्रम, जल, वीज बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली. केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय विद्युत आयोग यांची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना झाली. १९४२ ते १९४६ या चार वर्षांच्या कालावधीत अखिल भारतीय जल धोरणाची पायाभरणी झाल्यामुळे जलसिंचन आणि विद्युत ऊर्जेची नेत्रदीपक प्रगती झाल्याचे दिसून येते. याचे सारे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते असेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी नमूद केले.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘घटना समिती'चे अध्यक्ष म्हणून राज्य घटनेच्या सर्वसमावेशक निर्मितीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी करु शकले नसते असे काढलेले उद्गार बाबासाहेबांच्या एकमेवाव्दितीय कार्यकर्तृत्वाचे द्योतक असल्याचे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांना ब्रिटीश चरित्रकारांनी ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' संबोधले आणि ते पुढे रुढ झाले अशीही माहिती दिली.