महापरिनिर्वाण दिनी ऐरोली येथील डॉ. आंबेडकर स्मारकस्थळी भेटीचे आवाहन

चैत्यभूमीवरही नवी मुंबईतील ज्ञानस्मारकाच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यासाठी विशेष स्टॉल

नवी मुंबई : ऐरोली, सेवटर-१५ येथील नवी मुंबई महापालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अल्पावधीतच देशातील अत्यंत आगळेवेगळे स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले आहे. ५ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या स्मारकातील सुविधांचे लोकार्पण झाले असून यावर्षी स्मारकाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात २ लाख १ हजारहून अधिक नागरिकांनी स्मारकास भेट दिल्याची रजिस्टरला नोंद असून अभिनव स्मारक म्हणून प्रशंसा केलेली आहे.

समृध्द ग्रंथालय, सातत्यपूर्ण व्याख्यानांमुळे ‘ज्ञानस्मारक' ओळख रुढ...
स्मारकाला भेटी देणाऱ्या नामांकित विचारवंत, साहित्यिक, व्याख्यात्यांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी ‘ज्ञान हीच शक्ती' या बाबासाहेबांच्या विचार प्रणालीवर आधारित ‘ज्ञानस्मारक' असल्याचे अभिप्राय नोंदविलेले आहेत. त्यांच्याप्रमाणेच याठिकाणी भेटी देणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील विविध राज्यांच्या नागरिकांनी आणि परदेशी पर्यटकांनीही स्मारक म्हणजे बाबासाहेबांच्या सर्वस्पर्शी विचारांचे मूर्तीमंत रुप असल्याचे म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या चरित्रावर आणि विचारांवर आधारित पुस्तकांप्रमाणेच येथे आंबेडकरी विचारधारा तसेच महनीय व्यक्तीमत्वांवरील ५ हजारहुन अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालय असून त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररी आहे. सदर ग्रंथालय हाच खऱ्या अर्थाने या स्मारकाचा आत्मा असून या माध्यमातून अभ्यासकांना आणि वाचकांना विचारांचा खजिना विनामुल्य उपलब्ध आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना महत्व देणारे सदर स्मारक बाबासाहेबांचे पुतळाविरहीत ‘ज्ञानस्मारक' म्हणून नावाजले जात आहे.

प्रेरणादायी इतर सुविधा दालनांचा नागरिकांवर प्रभाव
बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष दालन स्मारकाचे आणखी एक आकर्षण असून या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास उलगडतोच तसेच त्यापासून प्रेरणाही मिळते अशी भावना तेथे भेट देणाऱ्या असंख्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. येथे असलेल्या आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेंटेशन शोच्या माध्यमातून मिळणारी सुसंधी भारावून टाकते, अशी भावना तेथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत.

एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करु शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच २५० आसन क्षमतेचे वातानुकुलित प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या विविध सुविधा स्मारकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

ऐरोली मुलुंड पुलावरुन नवी मुंबईत प्रवेश करताना लांबूनच नजरेस भरणारा ५० मीटर उंचीचा भव्य डोम बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून पेनच्या निबच्या आकाराचा करण्यात आलेला आहे.

अशा विविध प्रकारच्या आधुनिक सुविधांनी संपन्न असलेल्या या ज्ञानस्मारकामध्ये मागील २ वर्षे सातत्याने विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे ‘विचारवेध' या व्याख्यान शृंखला अंतर्गत आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून विचारांचा जागर करण्यात येत आहे. इतर शहरांमध्ये व्याख्यानमालांना उपस्थितीची कमतरता भासत असताना स्मारकातील व्याख्यानांना मात्र श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून त्याचीही विशेष नोंद विविध व्याख्यानमालांमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर व्याख्यात्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

ज्ञानस्मारकाची महती सर्वदूर पोहोचविण्यात समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग...      
व्याख्यात्यांच्या तसेच स्मारकाला भेटी देणाऱ्या देशी-परदेशी नागरिकांच्या माध्यमातून स्मारकाची महती देशापरदेशात पोहचत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ्‌ीीस्ंा्‌व्ीीेस्ीीव् या स्वतंत्र फेसबुक, टि्‌वटर, इन्स्टाग्राम, युट्युब अशा सोशल मिडीया पेजला देखील जगभरातून असंख्य नागरिकांचे लाईक्स आणि कमेंटस्‌ प्राप्त होत आहेत.

नव्या पिढीतील मुलांवर ज्ञानसंपादनाचे संस्कार...
या स्मारकाचे वेगळेपण तेथे भेटी देणाऱ्या नागरिकांना मनापासून जाणवत असून त्यांच्यामार्फत इतरांपर्यंत या स्मारकाची महती पोहोचवत आहे आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी, असे त्यांच्यामार्फत आवर्जुन सांगितले जात आहे. विशेषत्वाने नव्या पिढीमध्ये अर्थात मुलांमध्ये ज्ञान संपादनाचे विचार रुजावेत याकरिता पालक पुढाकार घेऊन आपल्या मुलांना या स्मारकाची भेट घडवित आहेत. अनेक जण मुंबई दर्शनाच्या सहलीसाठी येताना स्मारकाला आवर्जुन भेट देत आहेत.


चैत्यभूमीवर विशेष स्टॉलद्वारे स्मारकाची माहिती प्रसारित करुन स्मारकाला भेट देण्याचे आवाहन
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी देश-परदेशातून येणाऱ्या नागरिकांपर्यंत ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील विविध सुविधांची महती विशेष स्टॉल लावून छायाचित्रांसह आकर्षक रितीने प्रदर्शित करण्यात येत आहे. चैत्यभूमीला भेट देणाऱ्या नागरिकांनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या ज्ञानस्मारकाला भेट देऊन एक अलौकिक अनुभव आणि संस्मरणीय आठवण सोबत घ्ोऊन जावी, असे आवाहन सदर स्टॉलद्वारे करण्यात येत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

“टाकावू पासून टिकाऊ” ; आ. मंदाताई म्हात्रे यांची संकल्पना