हरित दिवाळी साजरी करा
नवी मुंबईकरांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन
नवी मुंबई :भारत सरकारच्या अधिसूचना अन्वये १२५ डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मवयर्ुरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. सदर वायू प्राणी आणि वनस्पती या दोघांना घातक आहेत.
त्याचप्रमाणे जनहित याचिका मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक-अधिनियम १८८४ आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध आणि नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही. तसेच परवानगी असलेले फटाके महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक आणि फटाके वापर करणारे नागरिक यांना करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' त्याचप्रमाणे ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान' यांची अंमलबजावणी केली जात असताना फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक हरित सण-उत्सव (ग्रीन फेस्टीव्हल) साजरे करणे अपेक्षित आहे.
या अभियान अंतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. त्यासोबत प्लास्टिकचाही वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे सण-समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करत दिवाळी उत्सव पर्यावरणपूरक आणि प्रदुषामुक्त असा हरित दिवाळी म्हणून साजरा करावा, असे आवाहन करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी येणारा दीपोत्सव सर्व नागरिकांना आनंदी आणि सुरक्षित जावो, अशा शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.