सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी शासन कटीबध्द - मुख्यमंत्री

डोंबिवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती-महाराष्ट्र शासन, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय (५/ड प्रभाग) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १० मार्च रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती'चे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, उपाध्यक्ष विवेक जगताप, माजी महापौर रमेश जाधव, स्थानिक पदाधिकारी, आदि उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांवर काम करीत आहेत. संपूर्ण देशात सामाजिक न्याय, सामाजिक समता, समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे. सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी, त्या दृष्टीने काम करण्यासाठी शासन देखील कटीबध्द आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘भारतीय राज्यघटना'चे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात उभे केलेले काम संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरले आहे. जगातील सर्वोत्तम संविधान त्यांनी जगाला दिले आहे. कल्याण (पूर्व) येथील निर्माण केलेल्या या स्मारकाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट विविध प्रकारे उलगडून दाखविला जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार सामाजिक क्रांतीचा वसा घेऊन हे शासन काम करीत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, शिक्षण, आर्थिक, विचार स्वातंत्र्य अशी बाबासाहेबांनी दिलेली शिकवण हाच या सरकारच्या राज्यकारभाराचा पाया आहे. ‘संविधान'मुळेच सर्वसामान्य व्यक्ती खासदार, आमदार, मुख्यमंत्री बनू शकतो. डॉ.बाबासाहेबांचे कर्तृत्व अशा स्मारकांमध्ये निश्चितच मावणारे नाही. परंतु, त्यांचा जीवनपट अशा स्मारकांमधून लोकांसमोर आणल्यानंतर स्मारक सर्वांसाठी ऊर्जा स्त्रोत ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी ना. रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यवत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला. सदर विचार घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी तसेच महाराष्ट्र सरकार आपले काम करीत आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांनी दिलेला ‘सर्वधर्मसमभाव'चा विचार घेऊन आपला देश सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाच्या निर्मितीविषयीचे विचार व्यक्त केले.

दरम्यान, कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले.

स्मारकाविषयीः
कल्याण (पूर्व) या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून त्याचे ८० % काम  पूर्ण करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६.८५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी प्रदर्शन हॉल, प्रशासकीय दालन, कन्सेप्ट थीम, होलोग्राफी शो, वाचनालय, आदि सुविधा असून पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १,३६५ चौ. मी. असून स्मारकाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ५४० चौ.मी. आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ८ फुट उंचीचा सुशोभित चौथरा बांधून त्यावर १२ फुट उंचीचा ब्राँझ धातुचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित विविध घटनांचे प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रक्षेपण, थीम व्यवस्था, वाचनालय, होलोग्राफी शो, तैलचित्रे आणि म्युरल्स आदि सोयी-सुविधा विविध कक्षात निर्माण करण्यात आलेल्या आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

थकीत कर भरुन जप्ती कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन