‘संकल्प स्वच्छतेचा' अंतर्गत आयुवतांचा अधिकारी-कर्मचारी नागरिकांशी संवाद

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये मिळालेले उज्वल यश सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे मिळालेले असून यावर्षी नवी मुंबई शहराने देशात द्वितीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केला. तसेच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार रेटींग मिळवले. यामुळे आपली जबाबदारी वाढलेली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन केले.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटरमध्ये आयोजित ‘संकल्प स्वच्छतेचा' या विशेष कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये केलेल्या वैशिष्टयपूर्ण कामांचा आणि उपक्रमांचा धावता आढावा घेतला. यामध्ये स्वच्छताकर्मींना एक दिवस त्यांच्या साफसफाईच्या कामापासून सुट्टी देऊन २ ते ३ हजार नागरिकांनी एकत्र येत त्यांचे सफाईचे काम वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विभागात केले. नवी मुंबईच्या यशात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच येथील स्वच्छताप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, उद्योजक, व्यावसायिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी, तृतीयपंथी नागरिक, प्रसारमाध्यमे अशा सर्व  घटकांचा महत्वाचा वाटा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यामार्फत स्वयंस्फुर्तीने केल्या जाणाऱ्या निरपेक्ष सहकार्याचा विशेष उल्लेख आयुवत नार्वेकर यांनी केला. नवी मुंबई शहरात स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद बघता शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळते, असेही आयुक्तांनी सांगितले. सदर व्यापक लोकसहभागामुळेच ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये तीन बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड आपण करु शकलो, असे त्यांनी नमूद केले.
‘संकल्प स्वच्छतेचा' करीत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'ला सामोरे जाताना ‘स्वच्छ भारत मिशन'ने जाहीर केल्याप्रमाणे ‘थ्री आर' या संकल्पनेनुसार नानाविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्लास्टिकमुक्त सोसायटी, क्लॉथ बॅग वेंडिंग मशिन, दत्तक शौचालय, रिसायकल अँड डाइन असे वेगळे उपक्रम राबविण्यासोबतच ‘थ्री आर' मधील ‘रिडयुस' अर्थात कचरा कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत ‘ड्राय वेस्ट बँक'उपक्रम राबविेणे, ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल' सर्व झोपडपट्ट्यांंमध्ये आणि गांवठाणांमध्ये राबविणे, थ्री आर सेंटर्सच्या संख्येत वाढ करणे आणि नुतनीकरण करणे, हॉटेल्समध्ये पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंवर भर देण्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्यात येणार आहे. याशिवाय ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'च्या संकल्पनेला अनुसरुन ‘सवर्युलर इकोनॉमी' या विषयावर देशव्यापी परिषद आयोजित करण्याचा मनोदय आहे. ‘मिशन इनोव्हेशन' उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संधी देत स्वच्छता उपयोगी संकल्पना उपलब्ध करुन त्यांची अंमलबजवणी केली जाईल, असेही आयुवतांनी सांगितले.

स्वच्छता विषयक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना ‘स्वच्छश्री' पुरस्काराने सन्मानित करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. स्वच्छता उपक्रमांमध्ये जनसहभागाची व्याप्ती वाढवून एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणावर सहभाग घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी प्रशीत बर्फे याने अत्यंत प्रभावीपणे सादर केलेल्या स्वच्छताविषयक मनोगताचे आयुक्तांसह उपस्थितांनी कौतुक केले. शाहीर रुपचंद चव्हाण यांनी स्वच्छतेचा पोवाडा सादर करीत संकल्प स्वच्छतेचा उपक्रमात स्वररंग भरले. तर स्वच्छताकर्मींच्या सन्मान परंपरेत उद्यान सफाई कर्मचारी आरती किनवटकर, हिराबाई मुल्ला, कविता बात्रे, ताराबाई मढवी तसेच सक्शन-जेटींग मशीनवरील कर्मचारी निलेश केदासे, अशोक पुजारी, सेल्वाराज कोंडर, तापस अधिकारी, विकी हरिजन, बाबासाहेब लांडगे, अँथनी अर्जुन यांना सन्मानित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील आणि किल्ला स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, भांडार विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ. प्रशांत ठाकूर यांच्या ‘गाव चलो अभियान'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद