‘मराठी भाषा संवर्धन'साठी शासन कटीबध्द -उपमुख्यमंत्री फडणवीस

 नवी मुंबई : कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम्‌ता द्रवली, झाले वसुधेचे घर..! या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने ‘मराठी भाषा संवर्धन'साठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले.

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन'च्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी भाषा-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ‘मराठी भाषा विभाग'च्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, ‘मराठी आंतरराष्ट्रीय मंच'चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ‘राज्य मराठी विकास संस्था'चे संचालक डॉ. शामकांत देवरे, आदि उपस्थित होते.

मराठी मातीत वैश्विकता आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म. ‘पसायदान'च्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला. सदर वैश्विक कल्याणाचा विचार हाच आपला खरा महाराष्ट्र आणि यासोबतच आपली मराठी भाषा आणि संस्कृतीही जोडली गेली आहे. हिंदू केवळ धर्मवाचक शब्द नाही तर ती एक जीवन पध्दती आहे. महाराष्ट्राने ती जीवन पध्दती अनादी काळापासून स्वीकारलेली आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वारकरी संप्रदाय परंपरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, बहिणाबाई चौधरी, वीर सावरकर या आणि यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेले काम हाच महाराष्ट्र धर्म होय. हाच धर्म घेऊन जगणारा मराठी माणूस या वैश्विक गुणामुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतो. म्हणूनच महाराष्ट्र सर्व जगात दिसतो, असे सांगून फडणवीस यांनी रशिया, जपान मॉरिशस या देशांमध्ये गेल्यानंतर मराठमोळ्या पध्दतीने झालेल्या त्यांच्या स्वागताची आठवण आवर्जुन सांगितली.

अलिकडेच सुरु झालेल्या ‘मराठी भाषा विद्यापीठ'शी मराठी भाषा विषयाशी संबंधित काम करणाऱ्या जगभरातील सर्व संस्थांनी जोडले जावे. मराठी भाषा जगातील एक समृध्द भाषा आहे. या भाषेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मराठी भाषेकडे पूर्वजांचा हजारो वर्षांचा विचारांचा ठेवा आहे आणि हाच ठेवा पुढच्या पिढीला देणे, काळाची गरज आहे. इंग्रजी व्यवहार भाषा असली तरी आपण आपल्या मुलांशी मात्र मराठीतच बोलायला हवे. प्रमाण भाषा महत्वाची तर आहेच; परंतु याचबरोबर बोली भाषेचा गोडवाही जपायला हवा, असेही फडणवीस म्हणाले.

जर्मन, चीन यासारखे देश मातृभाषेचा आग्रह धरत, त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगून त्यांच्या देशातील तज्ञ घडवतात. आपल्याकडेही तसे होणे आवश्यक आहे. जगात सर्वत्र मराठी लोक दिसतात; परंतु आपले अधिराज्य नाही. यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. याविषयी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आखले असून आता या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही शिक्षण मातृभाषेतूनच दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंच'चे मुख्य समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह विविध देशातील उपसमन्वयकांचा गौरव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदिका समिधा गुरु यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात हंगाम पूर्व हापूस आंब्याची विक्रमी आवक