उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची मागणी

नवी मुंबई : सानपाडा, सेक्टर-७ मधील महापालिका उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेले कचऱ्याचे ढिगारे तातडीने हटविण्यासाठी संबंधिताना आदेश देण्याची लेखी मागणी ‘अखिल भारतीय माथाडी संघटना'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा ‘भाजपा युवा मोर्चा'चे माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

समस्या मांडण्यापूर्वी उद्यान, क्रिडांगण, महापालिकेची रुग्णालये, समाजमंदीर, ग्रंथालय, मार्केट, वाहनतळ या महापालिका मालकीच्या सार्वजनिक जागांची स्वच्छता आणि डागडुजी प्रशासनाला वेळोवेळी करणे शक्य नसेल तर किमान या सार्वजनिक जागांना साधु संत, राष्ट्रपुरुष, महामानव, स्वातंत्र्यसेनानी यांची नावे यापुढे देण्यात येऊ नये. या नावांसोबत लोकांची भावना जोडलेली असते. उद्या या नाव दिलेल्या वास्तुंना बकालपणा आल्यास समाज नाराज आणि संतप्त होईल. परिणामी, याचा उद्रेक झाल्यास महापालिका प्रशासनाला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी विनंती पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाला निवेदनाच्या सुरुवातीला केली आहे.

दरम्यान, सानपाडा, सेक्टर-७ मध्ये महापालिकेच्या संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यानाकडे आपण गेल्यास गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच कचऱ्याचे ढिगारे पडलेले निदर्शनास येतात. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसराला बकालपणा आला असून डासांचा उद्रेकही वाढीस लागला आहे. उद्यानात तसेच पदपथावरुन ये-जा करणाऱ्यांना या डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्या कचऱ्यातून पहाटे आणि रात्री जवळच्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

सानपाडा विभाग मराठी भाषिकांचा असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यातच या उद्यानाला जगतगुरु तुकोबा रायांचे नाव महापालिका प्रशासनाने दिले असून प्रवेशद्वारावरच गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे असल्याने स्थानिक लोकांमध्ये संतापाची भावना असून लोकभावनेचा उद्रेक झाल्यास लोक हाच कचरा महापालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा आणून टाकण्याची भिती आहे. त्यामुळे सदर समस्येचे गांभीर्य आणि लोकभावनेचा उद्रेक होण्याची शक्यता पाहता उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेले कचऱ्याचे ढिगारे हटवून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आवक कमी; बटाटा दरात वाढ