भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ -राज्यपाल

ठाणे : भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, हीच भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ठाणे येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने, सान्वी ओक लिखित ‘योध्दा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे' या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ७ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘ग्रंथदिंडी'च्या माध्यमातून ‘योध्दा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे' चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. उदय सामंत, ना. दिपक केसरकर, ना. दादा भुसे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘साहित्य संमेलन'चे अध्यक्ष रविंद्र शोभणे, ‘शारदा एज्युकेशन सोसायटी'चे विलास ठुसे, आदि उपस्थित होते.

मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, ते मी माझे भाग्यच समजतो. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घ्ोतले जाते. पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असे माझे व्यक्तिगत मत असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.

२०४७ साली भारत महासत्ता बनणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन ज्या प्रकारे काम करीत आहे त्यातून महाराष्ट्राचा विकास होणारच आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार यात शंकाच नाही. मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे. त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहे, असे राज्यपाल शेवटी म्हणाले.

माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा, अशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन अर्थात सर्वसामान्य माणूस, अशी बाळासाहेबांची शिकवण. मी त्याच शिकवणीच्या आधारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि कधी जाणारही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  

आमचे शासन २४ े ७ लोककल्याणासाठी काम करीत आहे. शासन विकास आणि कल्याण याची सांगड घालून लोकांसाठी चांगल्या योजना राबवीत आहे. यापुढेही शासन लोककल्याणाचा विचार करुनच निर्णय घेणार, राजकीय हिताचे कधीही निर्णय घ्ोतले जाणार नाहीत. निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचेच घेतले जातील, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयमी वृत्ती, लोकांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती असे त्यांचे गुणविशेष अनुकरणीय आहेत. संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष आहेत. अशा व्यक्तीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित होणे, निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक असते, अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावना व्यवत केल्या.

तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या शिकवणीचे अनुकरण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे गौरवोद्‌गार काढले. यावेळी पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पुस्तकाचे लेखक प्रा. ढवळ, डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने, सान्वी ओक तसेच ग्रंथाली प्रकाशनचे सुरेश हिंगलासपूरकर यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना ना. उदय सामंत यांनी केली. सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी तर आभार प्रदर्शन विलास ठुसे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शिवसेना ठाकरे गटाचा उरण तहसील कार्यालयावर मोर्चा