आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वाचा -अविनाश धर्माधिकारी

पनवेल : आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वपूर्ण असते. त्यामुळे स्वतःची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम, प्रतिभावंत होणे असे त्रिसूत्र अंगिकारा, अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालय (स्वायत्त) आणि सी. डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी-व्यक्तिमत्व विकास' या विषयावर मार्गदर्शन सत्र-विद्यार्थी संवाद कार्यक्रम त्याचबरोबरीने पाचवी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टीकोनातून भव्य रोजगार मेळावा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धर्माधिकारी बोलत होते.

याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ‘संस्था'चे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य अनिल भगत, संजय भगत, नितीन पाटील, प्राचार्य एस. के. पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, विकास घरत, प्रवीण पाटील, विजय चिपळेकर, अमित जाधव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजेश्री वावेकर,  कामगार नेते जितेंद्र घरत, ‘ओबीसी सेल'चे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, ॲड. चेतन जाधव, प्रदीप भगत, ‘युवा मोेर्चा'चे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, आनंद ढवळे, आदि उपस्थित होते.

नमस्कार आणि सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा अशी जीवनातील दोन मंत्र आहेत. समोरच्या व्यक्तीला नमस्कार केल्याने आपल्यात आणि त्या व्यक्तीमध्ये ईश्वरी चैतन्य निर्माण होते तर दुसऱ्या मंत्रामुळे सर्व विश्वाचे कल्याण करण्याची शक्ती मिळते. माणूस म्हणून आपल्याला सन्मानाने जगता आले पाहिजे आणि त्यासाठीही संकल्प महत्वाचा असतो. सर्व करिअर चांगले आणि समान असतात, फक्त त्याची निवड आपल्या बौध्दीक क्षमतेनुसार करणेही तेवढेच गरजेचे असते. ते करताना बदलता काळही लक्षात घेतला पाहिजे, असे अविनाश धर्माधिकारी यांनी नमूद केले.

तसेच जगात दिवसेंदिवस बदल घडत आहे आणि पुढील ६ वर्षात एआय विज्ञान क्षेत्रामुळे प्रचंड बदल होणार आहे. तसा त्याचा परिणाम होणार आहे. एआय मुळे रोजगार कमी होणार असले तरी त्या क्षेत्रातील रोजगारांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे त्याचाही वेध घेत त्यामध्येही करिअरची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान बदलेल, संधी बदलतील; मात्र स्पर्धा परीक्षा कायम राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहनही धर्माधिकारी यांनी यावेळी केले.

प्रत्येक तरुणाने त्याची जाणीव ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. विज्ञान पुढे जात आहे आणि त्यानुसार काळ बदलत आहे. त्यामुळे आपण निवडलेले क्षेत्र जीवनाला दिशा देणारे असले पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्या. त्या अनुषंगाने अविनाश र्धमधिकारी यांनी दिलेल्या सूचना आत्मसात करा, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, अटल सेतू, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीएमुळे आगामी पाच वर्षाच्या काळात या परिसरात जगातील विविध प्रकल्प येणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या अनेक विद्यापीठातून विविध शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांना संधीचे द्वार उपलब्ध होणार आहे. त्यानुसार परिसरात येणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख जे. एम. पावरा यांनी केले.
 
युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गर्शनाखाली झालेल्या 'भव्य रोजगार मेळावा' मध्ये १८२८ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील रिलायन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा स्ट्राईव्ह, गुगल पे, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय बँक, ओला, युरेका फॉर्ब्स, एलआयसी, फोन पे, डॉ. रेड्डी फाऊंडेशन, जिओ अशा नामांकित ६० कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी काही पात्र उमेदवारांना 'ऑन दि स्पॉट अपॉईंटमेंट लेटर' लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्राचार्य एस. के. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डोंबिवलीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी