वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
माझी वारी आनंदवारी मधून बाळगोपाळांचा संत मेळावा आणि वृक्षदिंडी
नवी मुंबई : नेरुळ येथील आर्यवर्त फाउंडेशनच्या वतीने १७ जुलै रोजी रोजी सकाळी ९ वाजता माझी वारी आनंदवारी चे आयोजन यंदा तिसऱ्याही वर्षी करण्यात आले होते. मुलांना महान हिंदू संस्कृती, परंपरांची माहिती आणि जाणीव व्हावी म्हणून या वारीत बालगोपाळांचा संत मेळावा भरवण्यात आला होता. सोबतच सामाजिक भान म्हणून पर्यावरणासाठी एक झाड माऊलीसाठी अशी अनोखी वृक्षदिंडीसुद्धा आयोजित करण्यात आली होती.
तेरणा हॉस्पिटल समोरील सर्विस रोडवर एकत्रितपणे जमा होऊन वारीला सुरुवात होऊन नेरूळ जिमखाना समोरील विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत वारी नेण्यात आली. तेरणा हॉस्पिटल समोर थांबून हरिपाठ, चालत भजन, तदनंतर श्रीगणेश सोसायटी, सेक्टर २८ मधील गणेश मंदिरात वारीची भेट, भजन आणि पुढे जाऊन बालाजी कृपा हावरे सोसायटी येथे वारीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, पुढे नेरूळ जिमखाना बाजूला वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण होऊन विठ्ठल मंदिरात वारीची सांगता झाली. सर्व बालगोपाळांनी संतरुपातील वेशभूषा करून या संतभेटीचा आनंद घेतला. वारी सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाल्यावरही अनेक बालगोपाळ भिजत वारीचा आनंद घेत होते. यावेळी आर्यवर्त फाउंडेशनतर्फे उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसाद कापडी पिशवीत देऊन प्लास्टिक बंदीचा संदेशसुद्धा दिला.