वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
पंढरपूर यात्रेकरुंच्या बसला अपघात
ट्रॅक्टरवर बस धडकून एवस्प्रेस मार्गावर घडला अपघात
नवी मुंबई : आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसने पंढरपूर येथे यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात बसमधील एका महिलेसह ३ भाविक तसेच ट्रॅक्टर मधील २ जण अशा एकूण ५ जणांचा मृत्यू तर बस मधील इतर ४२ भाविक जखमी झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर पनवेल येथे घडली. या अपघातातील जखमी भाविकांवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या मृत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली मधील निळजे घेसरगांव येथे राहणारे सत्यवान गायकर यांनी पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येकी १८०० रुपये खर्च घेऊन खंडेराय ट्रॅव्हल्स या खाजगी बसची सोय केली होती. त्यामुळे जुने डोंबिवली तसेच निळजे घेसरगांव भागातील ४२ भाविक पंढरपूर येथे यात्रेला जाण्यासाठी या बसमधुन १५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता निघाले होते. सदर बसमध्ये दहीसर येथे आणखी १० भाविक चढले. बसमधील भाविकांमध्ये २५ महिला होत्या. सदर बस मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर आल्यानंतर साधारण ५ कि.मी. अंतरावर ट्रॅव्हल्स बस चालकाला त्यांच्यापुढे असलेल्या टॅ्रक्टरचा अंदाज आला नाही.
त्यामुळे भाविकांची बस जोरदार ट्रॅक्टरवर धडकली. सदर धडक इतकी जबरदस्त होती, की या भाविकांची बस रस्त्याच्या बाजुला असलेला संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या पाईप लाईन वर धडकून पलटी झाली. त्यामुळे बस मधील सर्व भाविकांना किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. पनवेल शहर पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमी भाविकांना कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापैकी एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक आणि त्याचा सहकारी असे दोघे देखील गंभीर जखमी होऊन त्यांचा देखील त्यांचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृत आणि जखमींची नावेः या अपघातात गुरुनाथ बापू पाटील (७०), रामदास नारायण मुकादम (७०) आणि हैसाबाई पाटील (६५) या ३ भाविकांचा मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक तरेवाज सलाउद्दीन अहमद (२७) आणि दिपक सोहन राजभर (३०) या दोघांचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात बसमधील चालकासह ४२ भाविक किरकोळ आणि गंभीर जखमी झाले असून त्यापैकी विठाबाई बाळाराम काळण (४५), यमुनाबाई अशोक साळुंखे (५४), हिराबाई त्रिबंधु साळुंखे (६०), विशाल जनार्दन पाटील (४७) आणि बस चालक संजय बापुराव पाटील (५३) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर भाविकांना उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. 
अपघाताला जबाबदार मृत ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा...
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर ट्रॅक्टर घेऊन जाण्यास मनाई असताना सुध्दा चालकाने एक्सप्रेस मार्गावर ट्रॅक्टर नेल्यामुळे सदर अपघात घडल्याचे आढळून आले आहे. पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या पंढरपूर यात्रेकरुंच्या खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकाला पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने तो या ट्रॅक्टरवर धडकून सदरचा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी सदर अपघाताला मृत ट्रॅक्टर चालकाला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मनाई, मग एक्सप्रेस मार्गावर ट्रॅक्टर गेला कसा?
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात घडू नये यासाठी या मार्गावरुन दुचाकी, तीन चाकी तसेच ट्रॅक्टर या सारख्या वाहनांना बंदी आहे. एखाद्या वाहन चालकाने दुचाकी अथवा तीन चाकी वाहन नेल्यास वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, १५ जुलै रोजी मध्यरात्री एक्सप्रेस मार्गावर ट्रॅक्टर गेला कसा? वाहतूक पोलीस किंवा महामार्ग पोलिसांना ट्रॅक्टर निदर्शनास कसा आला नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वेळीच या ट्रॅक्टरला एक्सप्रेस मार्गावर जाण्यास रोखले असते तर सदरचा अपघात झाला नसता, अशा प्रतिक्रिया जखमी भाविकांमधून व्यक्त होत आहेत.