तुर्भे विभागातील रस्ते खड्डेमय

तुर्भे : मागील काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे तुर्भे विभागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे संबंधित नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे तुर्भे परिसरातील जनतेद्वारे महापालिका प्रशासनाविरुध्द संताप व्यवत केला जात आहे.

तुर्भे विभागामध्ये तुर्भे गाव, सेक्टर-२१, वाशी-तुर्भे लिंक रोड, एपीएमसी, वाशी सेक्टर-२६, वाशी विभाग येथील प्रत्येक चौकामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराकरिता केबल टाकण्यासाठी चर खोदले होते. केबल टाकल्यानंतर या चरांमध्ये थातूरमातूर डांबरीकरण करण्यात आले होते. परिणामी पहिल्या पावसातच या चरांमधील सर्व डांबर निघून गेली असून, चरांच्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे वाशी-तुर्भे लिंक रोड तसेच एपीएमसी मार्केट लगतचे रस्ते काँक्रीटचे असताना या रस्त्यात चर मारल्यानंतर या ठिकाणी पुन्हा काँक्रीटने बुजवणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात खडी आणि डांबराने रस्त्यावरील चर बुजवण्यात आल्याने या ठिकाणी काँक्रीट मधून सदर डांबरीकरणाचा भाग उखडून गेला आहे. त्यामुळे वाशी आणि तुर्भे परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते योग्य प्रकारे बुजवले न गेल्याने तुर्भे, वाशी विभागात सीसीटीव्ही कॅमेरे तेथे खड्डे असे समीकरण झाले आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे दिशेन जाणाऱ्या तुर्भे उड्डाणपुलाच्या मार्गिकेवरील डांबरीकरण उखडू लागले आहे. विशेष म्हणजे नुकतेच या मार्गिकेचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोपरी सिग्नल, पावणे, एपीएमसी मार्केट सिग्नल, अरेंजा कॉर्नर सिग्नल येथील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मॅपको मार्केट समोर, योगी एक्झिक्युटिव्ह हॉटेल समोर काँक्रिट रस्त्यावर तीन फूट रुंद, अर्धा फूट खोल पडलेल्या खड्ड्यातील सळ्या बाहेर आल्या आहेत. मात्र, पावसाने काळी काळ उघडीप घेऊनही महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे खड्ड्यांतून वाहने चालवून कंबरडे मोडून घेण्याशिवाय स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशी यांना पर्याय उरलेला नाही. परिणामी नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरुध्द संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी ४० प्लस खेळाडुंचे आंदोलन