विद्यार्थ्यांकडून ‘जनजागृतीपर पथनाट्य'द्वारे मतदानाचा संदेश

नवी मुंबई : नाटक संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याद्वारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहोचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत.

याचाच उपयोग मतदान विषयक जनजागृती करण्याकरिता करण्यात येत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागरुकता वाढविणारी पथनाट्ये बसविली आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खाजगी शाळांमधूनही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा' असे आवाहन करणारी पथनाट्ये आपापल्या शाळा परिसरात सादर केली. विशेष म्हणजे सदर पथनाट्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मिळूनच लिहिलेली होती. तसेच शिक्षकांनी पथनाट्य स्वरुपात बसवून घेतली होती.

पथनाट्ये शाळेच्या परिसरात सादर होत असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथनाट्यांच्या माध्यमातून भारतीय संविधान, लोकशाहीच्या सबलीकरणात मतदानाचे महत्व, ‘संविधान'ने दिलेला मतदानाचा अधिकार, कर्तव्य म्हणून मतदान करण्याची नागरिकांची जबाबदारी अशा आशयास अनुसरुन मतदान करण्याचे संदेश प्रसारण पथनाट्यांतून करण्यात आले.

२५- ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने मतदार जनजागृतीकरिता नवी मुंबई महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागानेही या कामी पुढाकार घेतला असून स्वीप कार्यक्रमांतर्गत १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या सुचनांनुसार रांगोळी, चित्रकला, प्रभातफेरी, निबंध, पोस्टकार्ड लेखन असे अभिनव उपक्रम शाळांमध्य राबविलेले आहेत.

शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, कल्पना गोसावी यांच्या नियंत्रणाखाली केंद्र समन्वयक यांच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांनाही मतदान विषयक जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे मतदान करण्याचा संदेश प्रभावी रितीने पोहोचविला जात आहे. शाळांनी आपापल्या क्षेत्रात सादर केलेली पथनाट्ये मतदान विषयक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पलेमिंगो पक्ष्यांच्या मृत्युमागे प्रकाश प्रदुषण?