आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर करा तक्रार 

नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागील शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर १०० मिनिटांत कार्यवाही केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. मात्र, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

हे सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी आपल्या मोबाईलवर ॲप उघडून उल्लंघनाचा प्रकार आणि घटनेचा तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करावे लागणार आहे. या ॲपच्या माध्यमातून तक्रारदाराला आपल्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा देखील घेता येणार आहे.

वापर कसा करायचा ?

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जाऊन सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे  एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण टीमला वेळेत कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी या ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोगाकडून संबंधित तक्रारीची चौकशी करून योग्य ती कार्रवाई केली जाते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध