राजकारण्यांचा देव त्याला मतदारांचा भेव - आमदार बच्चू कडू
कापसाला हमी भाव न दिल्यास मतदान न करण्याच्या पाट्या लावा-बच्चू कडू
नवी मुंबई : आजची तरुणाई रॉक, पॉप आणि डिजेच्या तालावर नाचते, थिरकते. साने गुरुजीनी म्हटले आहे की, आजच्या तरुणाईच्या ओठावर कोणते गाणे आहे त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. अभंग रिपोस्ट बँड यांनी मोठ्या ताकदीने आणि मजबूतीने रिमिक्स संगीताच्या माध्यमातून तयार केलेले १५० वर्षापूर्वीचे अभंग देखील आजच्या तरुणांच्या ओठावर येतील यात शंका नाही. त्यामुळे अभंग रिपोस्ट या टीम ने केलेली मेहनत वाया जाणार नाही असा विश्वास दिव्यांग कल्याण मंत्रालय व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नेरुळ येथे व्यक्त केला.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रविवारी सायंकाळी नेरूळ येथील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या अभंग सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू उपस्थित होते. खेडÎापासुन सुरु केलेली संघटना थेट शहरापर्यंत पोहचली आहे हे आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रतिसादावरून सिद्ध झाले आहे. याबद्दल त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडेकर आणि पनवेल शहर प्रमुख चंद्रकांत उतेकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी अभंग रिपोस्ट टीम ने सादर केलेला 'लाकडाचा देव त्याला अग्नीचे भेव ' सोन्याचा देव त्याला चोराचा भेव या अभंगाची रि ओढत, राजकारण्यांचा देव त्याला मतदाराचे भेव असे सांगत, राज्यातील शेतकऱयांच्या शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
एक क्विंटल कापसाचे उत्पादन करण्यासाठी शेतक-याला सुमारे १० हजार रूपये खर्च येतो. मात्र शेतक-याने पिकवलेल्या त्याच कापसाला अवघे ६ हजार रूपये क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही लढाई लढण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. राज्यात कापसाला भाव नाही, सोयाबीनला देखिल भाव नाही. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत असले तरी शेतकऱयांनी आता आपल्याला घरावर पाटी लावून त्यावर शेत मालाला भाव नाही, तुम्हाला माझे मत नाही असे लिहिण्याचे आवाहन केले. त्यानंतर राजकारणी कसे सरळ होतील ते बघा असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
यावेळी सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था, संघटना आणि नागरिकांचा विशेष सन्मान आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अभंग रिपोस्ट बँडच्या सादरीकरणाआधी जीवन विद्या मिशन नवी मुंबईच्या सदस्यांनी हरिपाठाद्वारे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रवीण खेडेकर आणि चंद्रकांत उतेकर यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.