ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई

ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या ‘कृती आराखडा'नुसार महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत.

नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ‘ठाणे'चा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका आणि काऊन्सील ऑफ एनर्जी एनव्हायर्नमेंट ॲण्ड वॉटर या संस्थांनी कृती आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.

आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरु करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, ‘सीएसआर'च्या माध्यमातून २५ ठिकाणी पाणपोई सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुध्द पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, अशी माहिती महापालिका मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

ठाणे स्टेशन, कोपरी पुल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं.३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकुम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फुट रस्ता-खारेगांव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आंब्याची आवक कमी