विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत

१०० दिवस कृती आराखडा संदर्भात आढावा बैठक संपन्न

ठाणे : आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, आणि जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्हा पालक सचिव सुजाता सौनिक यांनी ठाणे येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली १०० दिवस कृती आराखडा संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आवळे, ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी (झो.पु.प्रा. ठाणे) पराग सोमण, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, आदिवासी विकास ठाणे-अपर आयुक्त दीपक कुमार मीना, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले, कल्याण स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, ‘नवी मुंबई'चे सह-पोलीस आयुक्त संजय यनपुरे, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांड्ये, सह-पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, डीसीएफ-शहापूर दीपेश मल्होत्रा, कांदळवन-डीसीएफ शैलेशकुमार जाधव, वन संरक्षक अनिता पाटील, ठाणे उप वनसंरक्षक सचिन रेपाळे, प्रवर्ग डाकघर अधिकारी समीर महाजन, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, आदि उपस्थित होते.

या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, ‘माहितीचा अधिकार-२००५'ची प्रभावी अंमलबजावणी करणे, सीपीग्राम प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे, आदि विषयांचा आढावा घेतला.

बैठकीच्या सुरुवातीला कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी क्षेत्रीय कार्यालयासाठी आगामी १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखड्याप्रमाणे प्रभावी कार्यवाही करणे, राज्य सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, ‘माहितीचा अधिकार-२००५'ची प्रभावी अंमलबजावणी करणे, सीपीगराम प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे आदि विषयांची संगणकीय सादरीकरणाद्वारे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सदर कृती आराखड्याची गुड गव्हर्नन्स साठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प वेळेत आणि अधिक गतीने पूर्ण होतील, असे पाहावे. काही अडचण असल्यास व्यवतीशः संपर्क साधावा. प्रत्येक प्रकल्पाच्या संबंधित यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
-सुजाता सौनिक, मुख्य सचिव-महाराष्ट्र तथा पालक सचिव-ठाणे जिल्हा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘रिकामा तास, शिक्षण खास' या नवोपक्रमास दुसरा क्रमांक