नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
रेल्वे समस्यांविरोधात १० हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती
कल्याण : लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेऱ्या सोडा, ठाणे-कर्जत, कसारा शटल सेवा द्या, महिला विशेष लोकल सोडा या मागणीसाठी ‘उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ'च्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली मध्ये विविध प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाला जाग यावी यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून ‘प्रवासी अभियान' सुरु केले आहे. या ‘अभियान'ला १० हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला आहे.
संघटनासोबतच कार्य करत असून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा उत्स्फुर्त पाठिंबा प्रवासी नागरिकांनी दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत ‘प्रवासी अभियान'ला सहकार्य केले. रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करुन संघटनेला एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. ‘रेल्वे'चा निषेध नव्हे तर आता तरी जागे व्हा! या टॅग लाईनखाली संघटनांनी काळी फित बांधली. सर्वाधिक गर्दीचे बळी डोंबिवली मधीलच आहेत. त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतुने ‘प्रवासी अभियान'चा उपक्रम हाती घेण्यात आला होता. आबालवृध्द नागरिक देखील काळी फित बांधण्यासाठी पुढे आले होते.
मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आज अक्षरशः आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहेत. ‘मध्य रेल्वे'च्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी सदरचे ज्वलंत वास्तव लक्षात येईल. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणाऱ्या लोकल फेऱ्या, मेल-एक्स्प्रेस-मालगाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे, साध्या लोकल ऐवजी वातानुकूलित लोकल चालविणे, सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या सर्व गंभीर गोष्टींमुळे आज लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त आणि संकटात असून ते संतप्त झाले आहेत.
गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या ‘रेल्वे'च्या या प्रशासकीय अनास्थेविरुध्द ‘मुंबई रेल प्रवासी संघ'च्या आवाहनानुसार एमएमआर मधील लोकल प्रवाशांनी सफेद कपडे आणि काळी फित लावून रेल्वेतून प्रवास केला. अत्यंत शांततेच्या वातावरणात ‘प्रवासी अभियान' संपन्न झाले. याप्रसंगी ‘महासंघ'चे अध्यक्ष लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, रेखा देढिया, तन्मय नवरे, शशांक खेर, सागर घोणे आदिंसह संघटनांचे महिला, पुरुष पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते.