नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
विजेच्या समस्या विरोधात उरणकरांचा ‘महावितरण'वर मोर्चा
उरण : उरण तालुक्यातील पूर्व विभागात सारखी दररोज वारंवार वीज जाते. एकदा वीज गेल्यानंतर १२ ते १३ तास वीज येत नाही. विजेच्या अनेक विविध समस्या आहेत. त्या समस्यावर ‘उरण पूर्व विभाग मित्र परिवार'तर्फे वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला. मात्र, तरीही पूर्व विभागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘उरण पूर्व विभाग मित्र परिवार'तर्फे सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महावितरण'च्या कार्यालयावर २१ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला.
‘उरण पूर्व विभाग मित्र परिवार'ने ठरवल्या प्रमाणे एमएसईबी ऑफिस उरण येथे धडक दिली. यावेळी ‘महावितरण'चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांंची ‘मित्र परिवार'च्या पदाधिकारी-सदस्यांनी भेट घेत त्यांच्याकडे ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. त्यासाठी निवेदनही देण्यात आले. तसेच उरलेली आणि मंजूर झालेली कामे गणेशोत्सवापूर्वी त्वरित करावीत, अशी मागणी देखील करण्यात आली.
तसेच पुढील कामे किती दिवसात पूर्ण करणार याचे लेखी पत्रक आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने ‘महावितरण'कडे मागतिले. त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी लेखी पत्र देण्याचे कबूल केले. उरण पूर्व परिसरातील वीज सेवा सुरळीत करण्याचे आणि ग्रामस्थांच्या इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन ‘महावितरण'च्या वतीने संदीप चाटे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
दरम्यान, आरडीएसएस आणि एसएसएमआर योजनेत मंजूर झालेली काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचे पत्रक लवकरच मिळणार आहे, अशी माहिती गोरख ठाकूर यांनी दिली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, सुधाकर पाटील, गोरख ठाकूर, प्रांजल पाटील, संजय ठाकूर, निशांत ठाकूर, हेमंत ठाकूर, विश्वनाथ घरत, मिलिंद भगत, विनोद पाटील, हितेश पाटील, अनिकेत ठाकूर, पराग ठाकूर, चेतन ठाकूर, कुमार ठाकूर, अमित म्हात्रे, प्रितम म्हात्रे, वशेणी ग्रामपंचायत सदस्य संग्राम पाटील, राजेंद्र पाटील तसेच विभागातील इतर तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.