मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू'ची पाहणी 

उरण : देशातील सर्वात जास्त लांबी असलेला २२ कि.मी.चा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई असे २ तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटात पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प)'चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ६ जानेवारी रोजी या ‘अटल सेतू'ची ठिकठिकाणी थांबून पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी नामदार मंगल प्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, ‘एमएमआरडीए'चे आयुवत डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, ‘रायगड'चे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिकाआयुक राजेश नार्वेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. सदर मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा-शेवा येथे इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबईत अवघ्या २० मिनिटात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात पलेमिंगो पक्षी वाढले आहेत. अटल सेतू मार्ग मुंबई-गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरु केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले असून आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


परिसर सुशोभिकरण, वृक्षारोपणाच्या सूचना...
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरुन तेथील सुविधांची माहिती घेत त्याअनुषंगांने विविध सूचना ‘एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना दिल्या. ‘अटल सेतू'ची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सेतू वरील वाहतूक नियंत्रण केंद्राला भेट...
चिर्ले टोल प्लाझा जवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘अटल सेतू'वरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदिंचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घ्ोतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा प्रशासनासह ‘एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ‘अटल सेतू'ची पाहणी केल्यानंतर चिर्ले येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या भागात प्रकल्पाचे उद्‌घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

अटल सेतू विषयी...
मुंबई-ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) असा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना. ५०० बोईंग विमाने अणि १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ कि.मी. लांबीचा असून त्यातील १६.५० कि.मी. भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० कि.मी. भाग जमिनीवर. भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील १२ व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी १८ हजार कोटी रुपयांचा खर्च. सागरी सेतू मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा. मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर जवळजवळ १५ कि.मी.ने कमी झाले. महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे ७ वर्षांचा कालावधी लागला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका रुग्णालयातील रुग्णांवर फोर्टीजने मोफत उपचार करण्याची मागणी