भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन

‘अदानी ॲग्रो कंपनी'ला दहा दिवसांचा अल्टीमेटम

पनवेल : स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न केल्यास धरणा कॅम्प येथील ‘अदानी लॉजिस्टिक'च्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी २६ ऑवटोबर रोजी धरणा कॅम्प येथे करुन ‘अदानी ॲग्रो कंपनी'ला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.  

धानसर, धरणा, धरणा कॅम्प, खुटारी, पिसार्वे येथील स्थानिक भूमिपुत्रांची जमीन अदानी ॲग्रो कंपनीने संपादित केली असून, त्या जमिनीवर अदानी लॉजिस्टिक कंपनीची उभारणी झाली आहे. जमीन विकत घेत असताना स्थानिक भूमिपुत्रांना कामे, नोकरीत समावेश तसेच गावाला प्राथमिक सुविधा, रस्ता देण्यात आलेल्या आश्वासनासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणा कॅम्प येथे अदानी ॲग्रो कंपनी प्रवेशद्वारावर काम बंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात ‘भाजप'चे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कदम, प्रल्हाद केणी, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, गुरुनाथ गायकर, रवी म्हात्रे, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, प्रशांत कदम, समीर कदम, पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, चाहुशेठ पाटील, बजरंग दल अध्यक्ष मोतीराम गोंधळी, ओवे विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, माजी सरपंच राम पाटील,  माजी सरपंच कृष्णा पाटील, माजी सरपंच तन्वी घरत, संतोष पाटील, विनोद घरत,  भास्कर तरे, राजेश महादे, वैजनाथ पाटील, माजी नगरसेवक निशांत पाटील, बदलापूर येथील नगरसेवक आकाश राऊत, भोलाशेठ पाटील, शत्रुघ्न पाटील, लायन ग्रुप अध्यक्ष बाबूशेठ फडके, बेलपाडा ग्रामपंचायत'चे माजी सरपंच सोमनाथ म्हात्रे, सागर पवार, सुनिल म्हात्रे, अशोक साळुंखे, सुरेश पोरजी, नितेश पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दरम्यान, यावेळी आंदोलकांचा पवित्रा पाहता कंपनी व्यवस्थापन आणि पोलिसांकडून आंदोलकांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिवारातील लोकांना कंपनीमध्ये प्रत्यक्ष रोजगार मिळावा, शक्य असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कामाचे कंत्राट द्यावे, कंपनीच्या जागेभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांना बारमाही एक्सेस उपलब्ध असला पाहिजे तसेच सदर शेतकऱ्यांच्या जमिनीमधून कंपनीच्या ताब्यातील जमिनीकडे जाणारे पाणी, नैसर्गिकरित्या वाहणारे पाणी वाहून नेण्याची यंत्रणा कंपनीने उभी करावी, अशी मागणी या चर्चेत आमदार प्रशांत ठाकूर आणि शिष्टमंडळाने केली. तसेच या अनुषंगाने तहसिलदार तसेच महापालिका संबंधित अधिकारी, यांनी व्यवस्थापन यांच्यासमवेत बैठक घ्यावी, प्रकल्पाची उभारणी होत असताना येथील भूमिपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, कंपनी जर जुमानत नसेल तर आमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, हक्क मिळेपर्यंत लढतच राहणार असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी दहा दिवसांचा वेळ व्यवस्थापनाला दिला आहे. अदानी व्यवस्थापन चालढकलपणा करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, व्यवस्थापनाने आडमुठी भुमिका घेतली तर जशाच तसे उत्तर देऊ असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अदानी ॲग्रो कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.

धानसर, धरणा, धरणा कॅम्प, खुटारी, पिसार्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या जागा घेऊन या ठिकाणी प्रकल्प उभारला गेला. भूमिपुत्र स्थानिकांच्या मागणीसंदर्भात अनेकदा मागणी केली. मात्र, अदानी ॲग्रो कंपनी व्यवस्थापन चालढकलपणा करीत राहिले. अखेरीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. त्यांनी लागलीच भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत २६ ऑवटोबर रोजी आंदोलन करुन स्थानिकांचा आवाज बुलंद केला. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानतो. - नंदकुमार म्हात्रे, युवा नेते भाजप. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकासकामे वेळेत पूर्ण करा