‘महाविकास आघाडी'च्या नेत्यांनी बेताल वक्तव्य, माथी भडकविण्याचे काम न करण्याचा आ. प्रशांत ठाकूर यांचा सल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अभिमान, स्वाभिमान - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : महाराष्ट्र राज्यात कंत्राटी भरतीचे शंभर टक्के महापाप काँग्रेस, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी'च्या नेत्यांनी बेताल वक्तव्य आणि माथी भडकविण्याचे काम करु नये, असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘महाविकास आघाडी'ला दिला. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अभिमान आणि स्वाभिमान असून, त्यांच्यावर कुणीही आघात केला तर याद राखा, असा सज्जड दमही त्यांनी विरोधकांना आपल्या भाषणातून दिला.

राज्यात कंत्राटी भरतीचे महापाप काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार यांनी केले होते. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस, ठाकरे गटाचा निषेध २१ ऑवटोबर रोजी पनवेल मध्ये आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी आ. प्रशांत ठाकूर मार्गदर्शन करताना बोलत होते.

उध्दव ठाकरे यांच्या रुपात अडीच वर्षे कंत्राटी पध्दतीने राज्याला मुख्यमंत्री मिळाला होता. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे फक्त फेसबुकवरच दिसत होते. उध्दव ठाकरे लोकांना नाही भेटायचे पण शरद पवार यांना बरोबर भेटायचे.  शिंदे सरकार कसे पाडले जाईल यासाठी ‘महाविकास आघाडी'चा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मात्र, आत्ताचे सरकार जनहितासाठी काम करणारे आणि भक्कम आहे. त्यामुळेच जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. शरद पवार यांचा राजकीय खोटारडेपणा दिसून आल्याने त्यांच्यापासून त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते बाहेर पडले आहेत. राज्यातील नागरिक शरद पवारांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे बारामतीचा गड देखील हलला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी निवडून येणार आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेच्या विचाराने सरकार चालविले. उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या सोबतीने विधानसभा निवडणूक लढवली. पण, सत्तेसाठी स्वार्थीपणा करत उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना हाताशी घेतले आणि अखेर मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी फक्त जनतेची दिशाभूल केली, असे सांगून लोकहिताचे निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस यांचे आ. प्रशांत ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.

पनवेल शहर-तालुका भाजपा मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमास ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस ॲड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, नितीन पाटील, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ‘भाजपा'चे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, समीर ठाकूर, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ‘भाजपा ओबीसी मोर्चा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, ‘अनुसूचित जाती मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रसाद हनुमंते, नंदकुमार म्हात्रे, प्रितम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, उत्तर भारतीय सेल संयोजक संतोष शर्मा, आयुष्यमान भारत सेल संयोजक ज्योती देशमाने, बेटी बचाव बेटी पढाव संयोजक आरती तायडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘मनसे'च्या मॉनिटरींग रुमची संदीप देशपांडे यांच्याकडून पाहणी