सारसोळे येथे फुलपाखरु उद्यान बनविण्याची मागणी
आ.मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका
नवी मुंबई : नवी मुंबई सुनियोजित शहर असून या शहरामध्ये सर्व सुखसुविधा असल्याने नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. त्याव्यतिरिवत नवी मुंबई शहर मुंबई लगत असल्याने आधुनिक शहराचा दर्जा या शहराला लाभला आहे. तसेच या शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिध्द अशा पलेमिंगो आणि विविध पक्षाचा तसेच फुलपाखरु यांचा वावर असतो. त्यामुळे नवी मुंबई शहराला पलेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते. याच अनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी १७ ऑगस्ट रोजी रोजी मुख्यमंत्रूी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नवी मुंबई येथील सारसोळे पामबीच लगत असलेल्या १२ एकरच्या मोकळ्या भूखंडावर फुलपाखरु उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षात ‘फुलपाखरु (बटरफ्लाय गार्डन) उद्यान'ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. फुलपाखरु उद्यान नेमके काय आहे? ते कसा उभारतात? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. भारतात अनेक ठिकाणी तसेच वैयक्तिक असे फुलपाखरु उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारले गेले आहेत. पण, सिंगापूरच्या धर्तीवर नवी मुंबई मध्ये फुलपाखरु उद्यान बनविल्यास ते सदरचे ठिकाण एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारुपास येईल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरु उद्यान पाहण्यासाठी पर्यटकांची संख्याही वाढेल. या फुलपाखरु उद्यानामुळे नवी मुंबईचा दर्जा देखील वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होऊन नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. याकरिता ‘फुलपाखरु उद्यान'च्या माध्यमातून सुंदर पर्यटनाला चालना मिळेल, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करुन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यासाठी आदेश दिले आहेत. यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांना धन्यवाद दिले आहेत.