रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
कोपरखैरणे विभागातील पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक
महापालिका विभाग कार्यालयाला घेराव
नवी मुंबई : पाण्याच्या समस्येवरुन ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या वतीने १४ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयाला घेराव घालण्यात आला.
गेले कित्येक महिन्यापासून कोपरखैरणे विभागामध्ये होणारा अपुरा पाणीपुरवठा, दुषित पाणीपुरवठा, मलमूत्र असलेला पाणीपुरवठा, वेळोवेळी पाण्याच्या वेळेमध्ये न सांगता बदल करणे यामुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत ‘मनसेे'च्या वतीने कोपरखैरणे विभाग निवेदन देऊन गेल्या २ महिन्यांपासून पाठपुरावा सुरु होता. मात्र, विभाग अधिकारी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळेच याचा निषेध म्हणून कोपरखैरणे मनसे विभागतर्फे महापालिकेच्या पाणी विभागाला कुंभकर्णाची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी आठ दिवसांमध्ये पाणी समस्या दूर करण्याचे आश्वासन अभियंता शंकर जाधव यांनी ‘मनसे'च्या शिष्टमंडळास दिले. तर आठ दिवसात पाणी समस्या सोडवली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘मनसे'तर्फे देण्यात आला.
याप्रसंगी मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे, सखाराम संकपाळ, उपविभाग अध्यक्ष विजय शिंदे, शाखा अध्यक्ष सूर्यकांत मोरे, सचिन गोळे, जनहित कक्षाचे दत्ता तोडकर आणि महाराष्ट्र सैनिक हजर होते.