ऐरोली विधानसभा क्षेत्रमध्ये तिरंगा बाईक रॅली

तिरंग्याचा मान जगामध्ये वाढला -  आ. गणेश नाईक

नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत  ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये  आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो  देशप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक,  भाजपा  उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजपा विस्तारक अरुण पडते, आप्पा मुळे आदी मान्यवरांसह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिघा येथील तलावाजवळून आमदार  नाईक यांच्या शुभहस्ते सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा  चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना आमदार नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी तिरंग्यासोबत सेल्फी घेतली.

हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये शिस्तीने सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देत होते. देशभक्तीपर गीतांनी माहोल भारलेला होता. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. तिरंगा बाईक रॅली दरम्यान मध्ये-मध्ये वरूण राजानेही हजेरी लावली. तरीही तिरंगा बाईक रॅली त्याच जोशात, जल्लोषात पुढे जात राहिले. दिघा येथून सुरू झालेली ही बाईक रॅली ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध भागात मार्गस्थ होताना तिरंगा बाईक रॅलीचे सर्वच ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.  वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्ष प्रवेश