‘कोरोना'मुळे मृत व्यक्तींच्या वारसांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी

सानुग्रह सहाय्याची रक्कम प्रदान करण्याची कार्यवाही सुरु

पनवेल : राज्यात कोरोना महामारीच्या काळात ‘कोरोना'मुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये इतक्या सहाय्यक अनुदानाची रक्कम दीड वर्षानंतरही अद्याप मिळाली नसल्याचे मे-२०२३ मध्ये निदर्शनास आले आहे. एकूण मृतांपैकी अनुदानासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे ८ हजार ५४२ अर्ज प्रलंबित असल्याचे लक्षात घेता त्यांच्या वारसांना सहाय्य अनुदानित रक्कम तातडीने अदा करण्याबाबत तसेच या विलंबास जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल करुन या संदर्भात शासनाचे लक्ष वेधले.

 राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील यांनी या प्रश्नावर लेखी उत्तर दिले. ‘कोविड-१९' या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य या योजनेखाली आत्तापर्यंत २,०९,७५३ इतक्या पात्र अर्जदारांना रुपये १०४८.७६ कोटी इतक्या सानुग्रह सहाय्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजूर केल्यापैकी ८,१७३ इतक्या अर्जदारांचा बँक खाते तपशील बरोबर नसल्याने बँकेने प्रदान नाकारले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत संबंधित अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून अद्ययावत बैंक खाते तपशील प्राप्त करुन घेवून सानुग्रह सहाय्याची रक्कम त्यांना प्रदान करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे ना. अनिल पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिव आरोग्य सेनेने राबवले जनआरोग्य अभियान ​​​​​​​