वाशी येथे 'वीर जवान पुरस्कार २०२३ ' सोहळा संपन्न
'वीर जवान फाऊंडेशन' संस्थेच्या वतीने आयोजित 'वीर जवान पुरस्कार २०२३ सोहळा संपन्न
नवी मुंबई : २६ जुलै या 'कारगिल विजय दिन'चे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या भारतीय सेनेतील जवानांच्या परिवारांना मदतीचा हात देण्याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'वीर जवान फाऊंडेशन' संस्थेच्या वतीने आयोजित 'वीर जवान पुरस्कार २०२३ सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी सिनेसृष्टीतील प्रसिध्द पार्श्वगायक तथा मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, 'एमपीएससी'चे चेअरमन किशोर निंबाळकर, रेरा आयुक्त संजय देशमुख, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, एसीपी सुरेश मेनगडे, डीसीपी विवेक पानसरे, नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त बाबासाहेब रांजळे यांच्यासह नवी मुंबईतील राजकीय नेत्यांच्या हस्ते जवानांच्या परिवारांना ५० हजार रुपये रक्कमेचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर अविनाश लाड, अशोक गावडे, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी, रोहिदास पाटील, सुरेश सपकाळ, महिला नवी मुंबई जिल्हा संघटक सरोज पाटील, शितल कचरे, कमलेश वर्मा, सह संपर्कप्रमुख सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात हेमंत कुमार महाले यांच्या संगीत संयोजनत देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. या सोहळ्याचे नेतृत्व वीर जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक सुरेश काकडे यांनी केले. तसेच सुरेख सूत्रसंचालन विधी जैन यांनी केले. याप्रसंगी माजी सैनिक तसेच एन.सी.सी. जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील चार वर्षांपासून वीर जवान पुरस्कार सोहळा वीर जवान फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येत आहे. फाऊंडेशन भारतीय जवानांच्या परिवारांसाठी सातत्याने काम करीत आहे. भविष्यात या परिवारांची सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती करण्यासाठी नवी मुंबई मध्ये भूखंड घेऊन बहुउद्देशीय इमारत उभी करण्याचा मानस या फाऊंडेशनचा आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फाऊंडेशन तर्फे निवेदन देण्यात आले आहे, असे विजय नाहटा यांनी सांगितले. तसेच भविष्यात कोणत्याही वीर जवानांच्या कुटुंबियांना काहीही गरज लागली तरी आपण त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे, असे विजय नाहटा यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नवी मुंबई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.