‘मनसे'ची महावितरण कार्यालयावर धडक

वीज पुरवठा सतत खंडित; नागरिकांना प्रचंड त्रास

उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उत्तर रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयावर (महावितरण) धडक देण्यात आली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी ‘महावितरण'चे कार्यकारी अभियंता सतीश सरोदे यांच्यासमोर पनवेल तसेच उरण तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला.

पनवेल तसेच उरण तालुक्यात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून नागरिकांच्या वीज बिलात भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जून महिना अर्धा संपला तरी अजून पावसाला सुरुवात झाली नाही म्हणून ठीक आहे. पण, पाऊस सुरु झाला असता तर नागरिकांवर वीज खंडित होण्याचा काय परिणाम झाला असता?, असा सवाल ‘मनसे'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना  केला.

रायगड सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये विजेची नक्की काय परिस्थिती असेल?, असाही सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना केला. रायगड जिल्ह्यामध्ये लोकसंख्या वाढत असून, वीज पुरवण्याची क्षमता जुनीच असल्यामुळे  ट्रान्सफॉर्मर तसेच वीज वाहिन्यांवर अधिकचा भार येऊन वीज पुरवठा खंडित होत आहे. यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याची सूचना यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच पावसाळ्यात नागरिकांना विजेच्या कोणत्याही समस्येला सामोरे न जाण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करण्यात आली आहे, याचा आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी ‘मनसे'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष प्रविण दळवी, सचिव अतुल चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. आदिती  सोनार, पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, महिला अध्यक्ष सौ. रेखा पवार,  सचिव अल्पेश कडू, तानाजी पिसे, अनिकेत मोहिते, कैलास माळी, विश्वास पाटील, दिपक पाटील, राकेश भोईर, सुजित सोनावणे, चिंतामण मुंगाजी, राकेश भोईर, विजय तांडेल, अमोल बोचरे, गणेश बनकर, संजय मुरकुटे, राहुल चव्हाण, धनंजय भोरे, सिध्देश पावले, प्रतीक जाधव, सोनी बेबी, स्वरुपा सुर्वे, सोनल कदम, मनीषा देशमुख, शोभा गोरीवले, प्रज्ञा पाटील, मनीषा नायक यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिकाशिक्षण विभागाकडून ज्ञानपुष्प विद्यानिकेतन शाळेला नोटीस