रुट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी निर्भयरित्या मतदान करण्याचा दिला संदेश
नवी मुंबईमध्ये पर्यावरणदिनी भव्य वृक्षारोपण मोहीम
पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी - संदीप नाईक
नवी मुंबई-:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज वाशी सेक्टर १४ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये नवी मुंबई भारतीय जनता पक्ष, ग्रीन होप संस्था आणि श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक संवेदना आणि जनजागृती वाढत असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
वृक्षारोपण मोहिम प्रसंगी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, समाजसेवक विजय वाळुंज आणि अजय वाळुंज, समाजसेवक प्रभाकर भोईर, समाजसेवक सुरेश शिंदे, समाजसेवक एडवोकेट निलेश भोजने, समाजसेवक परशुराम ठाकूर, समाजसेविका शितल भोईर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, मँग्रो मार्शल संस्थेचे प्रमुख पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते रोहित मल्होत्रा, रा फ नाईक विद्यालयाचे विद्यार्थी, प्राचार्य प्रताप महाडिक, समाजसेवक प्रताप भोसकर, एडवोकेट अंशुवर्धन, युवक युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, औद्योगिक जगताचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमातून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आला. नागरिकांचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरे करण्यात आले. समाजातील गुणवंतांचा सत्कार करताना त्यांना वृक्षरोपे आणि पर्यावरण पूरक जूटच्या पिशव्या भेट देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन केले. केवळ 5 जून रोजी नाहीतर वर्षाच्या 365 दिवसांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवली पाहिजे. नवी मुंबईमध्ये पर्यावरण विषयक कृतिशील जाणीव दिसून येत असून ग्रीन होप आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक पर्यावरण संवर्धनाचे आणि जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. मँग्रो मार्शल सारख्या संस्था खाड्या, समुद्र, नद्यांमधील प्रदूषण रोखण्याचं कौतुकास्पद कार्य करीत आहेत. प्रदूषणासाठी घातक प्लास्टिकचा वापर टाळायला हवा असं सर्व म्हणतात परंतु केवळ बोलण्यापुरतं पर्यावरण प्रेम असायला नको तर प्लास्टिकचा वापर बंद करण्याची सुरुवात स्वतःपासून करून दुसऱ्यांसमोर कृतीशील आदर्श ठेवण्याचा सल्ला संदीप नाईक यांनी याप्रसंगी दिला.
पर्यावरणाचा हा ठेवा आपल्या पिढीकडून भविष्यातील पिढीकडे देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या वृक्षारोपण मोहीम प्रसंगी एक लाख वृक्ष रोपे लावण्याचा आणि ही वृक्ष रोपे जगवण्याचा संकल्प करण्यात आला.
विनामूल्य वृक्षरोपांचे वाटप
ग्रीन होप संस्थेतर्फे वृक्षरोपांच्या विनामूल्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती आणि संस्थांना वृक्षारोपणासाठी वृक्ष रोपे पाहिजे असतील त्यांनी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी बोनकोडे कार्यालय येथे शैलेश गोगावले मोबाईल क्रमांक 8451869616 आणि ऐरोली कार्यालय येथे अनिल मिश्रा यांच्याशी 7718888108 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.