४ जून रोजी ‘स्वराज्य रॅली'चे नवी मुंबईत स्वागत
‘आप'तर्फे राज्यभर ‘स्वराज्य रॅली'चे आयोजन
नवी मुंबई ः अल्पावधीत राष्ट्रीय दर्जा मिळवणारी आणि देशभर झपाट्याने विकसित होणाऱ्या ‘आम आदमी पार्टी'ने आता महाराष्ट्रात सुध्दा अधिक आक्रमकतेने विस्तृत होण्याचा दृढनिश्चय केलेला आहे. त्याअनुषंगाने ‘आम आदमी पार्टी'चे संस्थापक-पक्षाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात ‘स्वराज्य रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे.
‘स्वराज्य रॅली'ला २८ मे रोजी विठू माऊलीचा आशीर्वाद घेत पंढरपूर येथून सुरु झाली असून महाराष्ट्रामधून सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, नुक्कड सभा, पथनाट्ये, लोकगीते अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांसह पंढरपूर, सोलापूर, श्रीगोंदा, बारामती, सांगली, पलूस, कोल्हापूर, सातारा,पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, पनवेल येथून फिरत जवळपास ७८२ किलोमीटर अंतराची दरमजल करीत ‘रॅली'ची सांगता ६ जून रोजी शिवराज्यभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर ‘रायगड'च्या पायथ्याशी पाचाड येथे होणार आहे.
‘स्वराज्य रॅली'च्या आयोजनामुळे महाराष्ट्रभरातील ‘आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. सदर यात्रा येत्या ४ जून रोजी दाखल होणार आहे. यानंतर सकाळी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यात्रा नवी मुंबईत फिरणार आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुपारी १ः३० च्या सुमारास ‘स्वराज्य रॅली'चे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टीम आप नवी मुंबई' सज्ज झाली आहे.
दरम्यान, ‘स्वराज्य रॅली'च्या स्वागतासाठी नवी मुंबई परिसरातीलनागरिकांना उपस्थित रहावे, असे आवाहन ‘आप'चे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी केले आहे.