आमदार बच्चू कडू यांनी साधला नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद  

कोणाची गर्दी किती यावरच सध्या राजकारण सुरु -आ. बच्चू कडू

नवी मुंबई ः सध्या राज्यात सभा घेण्याची स्पर्धा लागली असून त्यात जनतेचे हित बाजुला राहून नेतेमंडळी स्वतःचाच स्वार्थ साधत आहेत. एकाने सभा घेतल्यानंतर दुसऱ्याने सभा लगेच घेतली पाहिजे. कोणाची गर्दी किती यावरच सध्या राजकारण सुरु आहे. मात्र, आम्ही आणि आमचा पक्ष (प्रहार जनशक्ती) या भानगडीत न पडता जनतेची सेवा कशी होईल याचीच काळजी घेत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी नवी मुंबईत केले.

नवी मुंबईत मागील दोन वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे काम सुरु असून त्याची जबाबदारी नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर आणि कामगार संघटनाचे चंद्रकांत उतेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आजतागत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आ. बच्चू कडू नवी मुंबईत आले होते.

आ. बच्चू कडू यांनी यावेळी उध्दव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यावरही निशाणा साधला आहे. एकाने सभा घ्ोतली की दुसरा सभा घेतो, तो मूर्खपणा आहे. आम्ही व्यवस्थे विरुध्द नेहमी उभे राहतो. त्यामुळेच आमच्यावर खटले दाखल केले जातात. त्याची आम्ही कधीही तमा बाळगत नाही. राज्यकर्त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे प्रजा स्वतःचे रोजचे प्रश्न सोडवण्यात तर राज्यकर्ते आपली पोळी भाजण्यात व्यस्त आहेत. सभेला नागरिक येतात आणि जातात; मात्र सोबत कोणी राहत नाही. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी फक्त निष्ठावंतच येतात, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

जो देतो त्याच्याकडे जातो अशा पध्दतीने आपली जनता बळी पडली आहे. देवाकडे पण आपण नेहमी व्यवहार करतो, दे नाय तर जा. दिवसागणिक लोकांच्या आवडी निवडी बदलतात. आम्ही (प्रहार जनशक्ती पक्ष) एकनाथ शिंदे यांना आम्हाला काही नको फक्त आणि फक्त दिव्यांग मंत्रालय स्थापन करा, असे सांगितले होते. त्यामुळेच देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचे काम ‘प्रहार'ने केले आहे. ‘प्रहार'ची ओळख भाषणाने किंवा सभेने नाही. जेवढी सभेत गर्दी असते, तेवढ्या लोकांची आम्ही कामे केली आहेत. पण, तुमची नजर सभेवर जाते, असा टोमणा देखील बच्चू कडू यांनी अन्य पक्षांना लगावला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणी, पाठपुराव्याला यश