पक्ष प्रवक्ते तथा ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के यांचा जाहिर सत्कार

बाळासाहेबांची शिवसेना'च्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

नवी मुंबई ः सानपाडा येथे ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे पक्ष प्रवक्ते तथा ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के यांचा जाहिर सत्कार आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, युवा नेते ममित चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर, माजी उपमहापौर अशोक गावडे, उपजिल्हाप्रमुख जगदीश गवते, ॲड. रेवेंद्र पाटील, माजी नगरसेवक राजू पाटील, महिला जिल्हाप्रमुख सौ. सरोज पाटील, शितल कचरे, दमयंती आचरे, आदि मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत नरेअश म्हस्के यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कोरोनाच्या कालावधीत जीव ओतून काम केले. त्यामुळे शिंदे यांची वाढती लोकप्रियता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना खुपली. त्यामुळे मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांची घुसमट सुरु झाली. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ‘काँग्रेस-राष्ट्रवादी'च्या दावणीला बांधली गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वर्गीय बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्या प्रतिमेला काळे लावले आहे. मातोश्रीवरुन आदित्य ठाकरे यांचा आव्हाडांना मदत करायची असा फोन आला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बाजुने बोलल्यामुळे आमची देखील मातोश्रीवर नेहमी अडवणूक होऊ लागली. कोरोनाच्या काळात मी महापौर असतानाही मातोश्री, वर्षा येथून कामात नेहमी अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आपणही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नरेश मस्के यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर सन २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजय चौगुले उमेदवार असताना त्यांना पाडण्यासाठी ठाण्यातील चरई येथील कार्यालयातून षडयंत्र रचण्यात आले, असा गौप्यस्फोट नरेश मस्के यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि सरकारच्या नावाने बोंबलल्याशिवाय विरोधकांना चैन पडत नाही असे सांगत उपनेते विजय नाहटा यांनी नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नरेश म्हस्के यांना यावेळी केले. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेमधील १११ प्रभागांमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना'च्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पदे केवळ स्वतःसाठी न मिरवता त्याचा जनतेच्या सेवेसाठी वापर करावा. जनतेपर्यंत पोहोचून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. तसेच आगामी कालावधीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महामेळावा, युवा आणि महिला सेनाचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती चौगुले यांनी दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडको घरांच्या किमती कमी करा; अन्यथा भीक मागा आंदोलन